प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. जिल्हा पुनर्वसन कार्यालयाकडून प्रकल्पग्रस्तांच्या कामांबाबत दिरंगाई व आर्थिक पिळवणूक होत आहे. या गैरकारभाराला चाप लावून प्रकल्पग्रस्तांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाया प्रश्नांना न्याय दिला जाईल, असा इशारा आमदार प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला. या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी कळविले आहे.
आमदार आबिटकर म्हणाले, जिह्यातील वारणा, दुधगंगा (काळम्मावाडी), कुंभी-कासारी, तुळशी, जंगमहट्टी, पाटगांव असे मोठे व मध्यम प्रकल्पांची कामे पुर्ण झालेली आहेत. परंतु अद्यापही या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गेल्या 30 ते 40 वर्षापासून प्रलंबित आहेत. तसेच पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असणारे धामणी, सर्फनाला, आंबेओहळ, नागणवाडी यासह अन्य प्रकल्पांची कामे पुनर्वसनाअभावी रखडलेली आहेत. याबाबत प्रकल्पग्रस्तांकडून जिल्हा पुनर्वसन कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून ही या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकाराचे सहकार्य होत नाही. उलट प्रसंगी नाहक त्रास, वेळ व पैसा खर्च करावा लागतो. येथील अधिकारी व कर्मचार्यांकडून वर्षानुवर्षे प्रकल्पग्रस्तांच्या कामाबाबत दप्तर दिरंगाई सुरु आहे.
एजंटामार्फत गेल्यास काम त्वरीत होते
पुनर्वसन कार्यालयामध्ये विशिष्ट एजंटांमार्फत एखादे काम घेवून गेल्यास ते मात्र त्वरीत करून दिले जाते. मात्र, कोल्हापूर जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्याकरीता ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपली वडोलीपार्जित जमीनी, घरे, नाती-गोती यासह अन्य स्थावर मालमत्ता सोडून पुनर्वसन स्विकारले अशा प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन विभागाकडून हेळसांड व आर्थिक पिळवणूक केली जाते. ही बाब गंभीर असून जबाबदार प्रशासकीय यंत्रणेला शोभनिय नसल्याचे आमदार आबिटकर म्हणाले.