भारतात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला घुबड हा पक्षी सध्या संरक्षित पक्षी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याला पकडणे किंवा त्याला मारणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. देशात इतरत्र घुबडांची संख्या झपाटय़ाने कमी होत असली तरी बिहारमध्ये मात्र ती वाढताना दिसत आहे. देशात घुबडांच्या 30 प्रजाती दिसून येतात. त्यापैकी सात एकटय़ा बिहारमध्ये आहेत.
घुबड हा शिकारी प्रवृत्तीचा आणि एकांतप्रिय तसेच निशाचर म्हणजे रात्री जागा राहणारा आणि शिकार करणारा पक्षी आहे. घुबडाबद्दल अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजुती असल्याने त्याला मारले जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. मंत्रतंत्रांवर विश्वास ठेवणारे लोक घुबडांना पकडून पाळतात. त्यामुळे घुबडांची संख्या झपाटय़ाने खालावत असली तरी बिहारमध्ये ती वाढून गेल्या पाच वर्षात दहा हजारपर्यंत पोहोचली आहे. प्रशासनाचे प्रयत्न यासाठी कारणीभूत आहेत. तथापि, आता घुबडांपाठोपाठ त्यांना पकडणाऱयांचीही संख्या वाढू लागली आहे. परिणामी प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. बिहारचे हवामान घुबडांची संख्या वाढण्यासाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. आता प्रशासनाने घुबडांच्या संरक्षणासाठी विशेष योजना तयार करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.