बेळगाव / प्रतिनिधी
कनेक्टिंग इंडिया असे ब्रीदवाक्मय घेऊन सुरू झालेल्या बीएसएनएलच्या बेळगाव जिल्हय़ातील 331 कर्मचारी व अधिकाऱयांनी एकाचवेळी बुधवारी स्वेच्छानिवृत्ती घेतली. खासगीकरण व सरकारच्या जाचक अटींमुळे स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय कर्मचाऱयांनी स्वीकारला आहे.
बीएसएनएल या केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असणाऱया कंपनीला मागील काही वर्षांपासून ग्रहण लागले आहे. कर्मचाऱयांवर विविध अटी लादण्यात येत आहेत. या अटी मान्य नसल्याने कर्मचाऱयांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे. बुधवारी देशातील विविध भागात स्वेच्छानिवृत्तीचा हा कार्यक्रम पार पडला.
बुधवारी कॅम्प येथील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयातही स्वेच्छानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये कर्मचारी व अधिकाऱयांचा समावेश आहे. यावेळी कर्मचारी आपल्या भावना व्यक्त करीत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. आपण स्वीकारलेली नोकरी पूर्ण करून निवृत्त होण्याची प्रत्येक कर्मचाऱयाची इच्छा असते. परंतु नोकरी अर्धवट सोडावी लागत असल्याने कर्मचाऱयांमध्ये नाराजी दिसून आली.
यावेळी बीएसएनएलच्या युनियन एम्प्लॉईजचे अध्यक्ष वाय. आर. हंचिनमनी, उपाध्यक्ष अरविंद कौलगी, जोसेफ बारदेसकर, चंद्रकांत पाटील, बसवंत कांबळे, श्रीकांत कांबळे, जोशी मॅडम यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.