केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गाच्या हालचाली गेल्या काही वर्षांपासून सुरू होत्या. आता त्याला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखविल्याने प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. एकूण 73 कि.मी.चा रेल्वेमार्ग आहे. या रेल्वेमार्गासाठी 927 कोटी 40 लाख रुपये मंजूर झाले आहेत. आता या कामाला गती मिळणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेळगाव-देसूर, करविनकोप्प, बागेवाडी, एम. के. हुबळी, हुलीकट्टी, कित्तूर, तेगुरू, मुमीगट्टी, क्मयारकोप्प, धारवाड अशा एकूण 11 मार्गांवर रेल्वेथांबे होणार आहेत. राज्य सरकार 50 टक्के तर केंद्र सरकार 50 टक्के खर्च करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लोंढय़ापासून धारवाडला जावे लागत होते. त्यामुळे बराच उशीर आणि हा प्रवास लांबचा होत होता. प्रवाशांच्या दृष्टिकोनातून धारवाड-बेळगाव हा मार्ग झाल्यास वेळही वाचणार आहे. जवळपास 3 तास वेळ वाचणार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनेही या मार्गाला मंजुरी दिल्याने तातडीने कामाला सुरुवात होईल. या रेल्वे मार्गासाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार आहेत, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली.
या रेल्वेमार्गाच्या सर्व्हेच्या कामाला 2013-14 पासून सुरुवात झाली आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. त्यानंतर या रेल्वेमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे बेळगावबरोबरच कित्तूर औद्योगिक क्षेत्रालाही फायदा होणार आहे. केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाला परवानगी दिल्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील रेल्वेचा विस्तार वाढत चालला आहे. देशात विविध रेल्वे मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. बेळगाव-धारवाड याचबरोबर इतर भागामध्ये रेल्वे जोड प्रकल्पासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आजपर्यंत केंद्र सरकारने या सर्वच कामांसाठी सहकार्य केले आहे. यापुढेही सहकार्य मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे निश्चितच बेळगावमधून इतर ठिकाणी आणखी रेल्वेमार्ग जोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गामुळे बेंगळूर-हुबळीहून बेळगावमार्गे पुणे-मुंबईकडे प्रवास करणाऱया प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाचा निश्चितच फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.