भगवंत उद्धवाला म्हणाले, योगमार्गाची वाट बिकट असल्याने ती तुडवण्यात यशस्वी होणारे साधक फार थोडे असतात पण त्यामानाने भक्तिमार्ग सोपा आहे. त्यात माझ्या सर्वांगसुंदर मूर्तीचे ध्यान करावे. माझ्या एक एक अवयवांवर लक्ष केंद्रित करत करत शेवटी माझ्या सुहास्य चेहऱयाचे ध्यान करावे व माझ्या स्मितावर लक्ष केंद्रित करावे.
नंतर त्या हास्याचेही ध्यान सोडून देऊन त्या हास्यामध्ये जो घनदाट आनंद भरलेला असतो, त्यामध्ये आपले मन घालावे आणि त्यातच सावधपणाने नि÷ा ठेवावी. त्या आनंदाने आपले मन आनंदयुक्त झाले, म्हणजे साधकांना निश्चयेकरून त्यातच आत्मानंदाची प्राप्ती होईल. जेव्हा चित्त मुखारविंदावर स्थिर होईल, तेव्हा ते तेथून काढून घेऊन आकाशात स्थिर करावे. त्यानंतर आकाशाचे सुद्धा चिंतन करणे सोडून देऊन माझ्या स्वरूपावर आरूढ व्हावे आणि माझ्याखेरीज अन्य कशाचेही चिंतन करू नये. त्या आनंदपदाची प्राप्ती झाली असता जिकडे तिकडे सर्व चिदाकाशच दिसू लागते. त्या चिदाकाशात सावधपणाने आपले चित्त ठेवावे. नंतर चिदाकाश, चित्त आणि चिंतन हे ध्यानातील तिन्ही भेद सोडून देऊन परमानंदाने परिपूर्ण आणि भेदशून्य असा चित्स्वरूप, त्या माझ्यामध्येच आपली वृत्ती निमग्न करून सोडावी. जेव्हा अशा प्रकारे चित्त एकाग्र होते, तेव्हा ज्याप्रमाणे एक ज्योत दुसऱया ज्योतीत मिळून एकरूप होते, त्याचप्रमाणे भक्त स्वतःमध्ये मला आणि मज सर्वात्म्यात स्वतःला पाहू
लागतो.
याप्रमाणे साधकांची आत्मवृत्ती माझ्या स्वरूपात एकरूप होऊन राहिली, म्हणजे मीपणाची स्फूर्ति अद्वैतामध्ये विरून जाते. ह्याप्रमाणे त्या वेळी मी-तूपणाचा भासही निखालस लयास जातो आणि परमानंदात्मक असे माझे आत्मसौख्य अद्वैत स्वरूपाने भरून राहाते. ज्याप्रमाणे एका ज्योतीला दुसरी ज्योत मिळाली म्हणजे दोहीचे मिळून एकच तेज होते, त्याप्रमाणे जीव आणि चैतन्य ह्यांची स्फूर्ति, अद्वैतसुखाचा लाभ झाल्याने एकरूप होऊन जाते. कोटय़वधी दिव्यांत तेल वात घालून ते दिवे लावले म्हणजे निरनिराळे कोटी दिवे असे म्हणतात, पण त्या कोटी दिव्यांमध्ये तेज असते ते एकच असते त्याप्रमाणे अद्वैतामध्ये जीव हा ज्ञानरूपच असतो.
देह आणि इंद्रिये यांच्या उपाधीमुळे जीवाला निराळेपणा भासतो, पण तोच अद्वैताचा बोध झाला म्हणजे आत्मस्वरूप आणि जीव हे एकच आहेत हे लक्षात येऊन जीव आत्मस्वरूपामध्येच लीन होतो. तेव्हा एक परमसुखच काय ते शिल्लक राहाते असे म्हणणारेही कोणी नाही. एकटे एकच एक आत्मसुख सुखमय भरून राहिले. ज्याप्रमाणे साखरेनेच साखर खाऊन पहावी किंवा ज्याप्रमाणे उदकानेच उदकात स्नान करावे किंवा सुगंध येण्याकरिता तुपानेच तुपात शिरावे त्याप्रमाणे माझ्या ध्यानाची स्थिती म्हणजे साधकांना मोठा लाभच होय. अशा प्रकारे जो योगी अत्यंत तीव्र ध्यानाच्याद्वारे माझ्यामध्येच आपले चित्त एकाग्र करतो, त्याचा द्रव्य, ज्ञान, क्रियांविषयीचा अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होतो आणि त्याला सगळीकडे परमात्म्याचेच स्वरूप दिसू लागते. त्यामुळे त्याला तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते. ह्याप्रमाणे तीव्र ध्यानस्थितीने समाधीपर्यंत यथासांग ध्यान केले असता, साधकाला तत्काळ माझी प्राप्ती होते. हे माझे ध्यान अत्यंत उत्तम आहे. ते जर सदोदित निःसीम रीतीने मनामध्ये ठसले, तर अधिभूत, अधिदैव व अध्यात्म असा तीन प्रकारचा भ्रम ते राहूच देत नाही.
विषयसेवन करणारा, विषय आणि विषयाचा संभ्रम, ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञानोपक्रम, कर्म, कर्ता आणि क्रियेचा भ्रम, ह्यांचे नामरूप सुद्धा शिल्लक रहात नाही. तसेच ध्येय, ध्याता आणि ध्यान, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन, मन, मननकर्ता आणि मनन, यांचे भान मुळासकट छेदून टाकले जाते. देव, देवी आणि देवता, भज्य, भजन आणि भजन करणारा, लक्ष्य, लक्षण आणि लक्ष देणारा, ह्यांची वार्ताही उरत नाही. त्यामुळे योग्यतेसहवर्तमान महायोग किंवा समाधिसुखाचा सुखोपभोग किंवा जीव आणि शिव ह्यांचे आत्मैक्मय ह्या गोष्टीही शिल्लक रहात
नाहीत.
क्रमशः