बेळगाव / प्रतिनिधी
स्मार्ट सिटीअंतर्गत बसस्थानकात सुमारे तीस कोटी रुपये खर्ची घालून सुसज्ज असे आधुनिक बसस्थानक उभारण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या बसस्थानकात सोयीपेक्षा असुविधाच अधिक असल्याचे दिसून येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकात अनेक समस्या निर्माण झाल्या असून प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बसस्थानकातील उखडलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली असून जागो-जागी खड्डय़ांतून पाणी साचले आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच ही परिस्थिती असल्याने प्रवासी व वाहनधारकांना यातूनच वाट काढावी लागत आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे बससेवा साधारण दोन महिने बंद होती. त्यामुळे परिवहन ला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर सुरू झालेल्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद थंडावलेला आहे. त्यामुळे परिवहन मंडळाची बससेवा तोटय़ात सुरू आहे. मात्र आता गेल्या चार दिवसांपासून प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असली तरी बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आवारात जागो-जागी खड्डे पडून पाण्याची डबकी निर्माण झाल्याने बसेस देखील यातून ये-जा करत आहेत. ठिकठिकाणी असलेल्या खड्डय़ांच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालकांची कसरत सुरू आहे. दरम्यान, याचवेळी शेजारून बस गेल्यास गढूळ पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे.
कचरा उचल करण्याकडे दुर्लक्ष
बसस्थानकात स्थानिक प्रवाशांबरोबर लांब पल्ल्याच्या प्रवाशांची देखील वाढ होताना दिसत आहे. बसस्थानकात येणाऱया कामगार, नोकरदार, स्थानिक वयोवृद्धांना चिखलातून ये-जा करावी लागत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्थानकाच्या आवारात असलेल्या शौचालयाशेजारी कचऱयांचे साम्राज्य निर्माण झाले असून उचल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिवहन मंडळाने याकडे लक्ष देऊन सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.