‘त्या’ भू-माफियांवर कारवाई करा :
प्रतिनिधी/ बेळगाव
मरणहोळ येथील शेतकऱयांची 900 एकर जमीन बोगस कागदपत्रे तयार करून मोठय़ा भूमाफियांनी लाटण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विरोधात मरणहोळ येथील शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून पूर्वीप्रमाणेच आमची नावे उताऱयावर नोंद करावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
मरणहोळ येथील सर्व्हे क्रमांक 33 व 34 ही देसाई यांच्याकडून या शेतकऱयांनी खरेदी केली होती. बॉण्डद्वारे खरेदी करून गेली 100 हून अधिक वर्षे ही जमीन आम्ही कसत आहे. असे असताना बेळगावमधील काही भू-माफिया न्यायालयात बोगस कागदपत्रे दाखल करून निकाल आपल्या बाजूने करून घेतला आहे. याबाबत शेतकऱयांना कोणतीच माहिती नाही. त्यानंतर त्या निकालाच्या आधारे काही जणांनी आपली नावे दाखल केली आहेत. या सर्व प्रकरणाचा तपास करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.
मरणहोळ येथील जवळपास 160 कुटुंबे आम्ही ही जमीन कसत आहे. मात्र आता उताऱयावर दुसरी नावे दाखल करून आम्हाला धमकी देण्यात येत आहे. तेव्हा त्या भू-माफियांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. या जमिनीचा खरेदी व्यवहारही काही जणांनी केला आहे. तेव्हा तो थांबवावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला.
यावेळी रयत संघटनेचे प्रकाश नाईक, बुद्धाजी एमेटकर, लक्ष्मण धोंडिबा पाटील, संजय पाटील, लक्ष्मण एमेटकर, शट्टू लक्ष्मण पाटील, मारुती सोनारवाडीकर, रामचंद्र पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.