गोंयकार अगेन्स्टमरिना संघटनेची मागणी
प्रतिनिधी / पणजी
काही दिवसांपूर्वी नावशी येथील मरिना प्रकल्प रद्द करण्याचे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. जर सरकार हा प्रकल्प रद्द करण्यात गंभीर आहे तर त्यांनी आपली भूमिका येत्या दोन दिवसात स्पष्ट करावी. तसेच ज्या कंपनीने याचिका दाखल केली आहे ती रद्दबातल करावी आणि प्रकल्प रद्द केल्याचे लेखी स्वरूपात द्यावे नाहीतर कडक भूमिका स्वीकारावी लागेल असा इशारा गोयंकार अगेन्स्ट मरिना संघटनेचे समन्वयक ऍड. सुरेश पालकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
दोन वर्षांपासून नावशी येथील प्रस्तावित मरिना प्रकल्प नको म्हणून सरकारकडे मागणी करत आहे. सदर लढा न्यायालयातही पोहचलला आहे. याशिवाय सदर प्रकल्पाची कंपनीने जनसुनावणी व्हावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली असून बुधवारी सुनावणीसाठी येणार आहे. सदर प्रकल्पाला 13 पंचायती येतात. हा प्रकल्प जर गोमंतकीयांसाठी चांगला आहे तर कशाप्रकारे हा प्रकल्प चांगला आहे त्याबद्दल चर्चा करावी किंवा प्रकल्प रद्द करावा. सदर प्रकल्पामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. सरकार हे गोमंतकीयांबरोबर आहे की बाहेरच्या कंपनीबरोबर आहे हे स्पष्ट करावे. या प्रकल्पामुळे सर्व नैसर्गिक संपत्ती नष्ट होईल. जर मुख्यमंत्र्यांनी विधान केले आहे त्यावर अंमलबजावणी करावी अशी मागणी पालकर यांनी यावेळी केली.