अंधारासह पाणीटंचाईची समस्या : आमदारांकडून अधिकाऱयांची कानउघाडणी, तातडीने समस्या सोडविण्याचे आदेश
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यातील मोहिशेत ग्रामपंचायत हद्दीतील माचाळी गावातील गावठाण जमिनीत जवळपास 20 कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्या वसाहतीत वीजपुरवठा तसेच पाण्याची सोयही करण्यात आली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून त्या ठिकाणी जाणारी वीजवाहिनी तुटल्याने त्या भागाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे वसाहतीमधील नागरिकांना पाणीटंचाईचा तसेच अंधाराचा सामना करावा लागत आहे.
यासंदर्भात त्यांनी आमदार अंजली निंबाळकर यांची भेट घेऊन या गंभीर अडचणींची त्यांना माहिती दिली असता, या प्रकरणी त्यांनी खानापूर हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता व सेक्शन ऑफिसरला धारेवर धरून ती समस्या तातडीने दूर करण्याचा आदेश दिला आहे.
माचाळी गावाजवळील या वसाहतीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वीजपुरवठा सुरू आहे. त्या विजेवरच त्या भागाचा पाणीपुरवठा देखील अवलंबून आहे. त्या ठिकाणी जाणाऱया वीजवाहिन्यांसाठी पूर्वीपासूनच खासगी जागेतून वीजखांब घालण्यात आले आहेत. पण त्यापैकी एका शेतकऱयाने स्वतः खांबावर चढून या भागाचा वीजपुरवठा खंडित केला असल्याची तक्रार रहिवाशांनी केली. वीजप्रवाह खंडित झाल्याने रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य तसेच पाणीपुरवठा देखील बंद झाल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे त्या वसाहतीमधील जनतेने सांगितले. त्यासंदर्भात त्यांनी खानापूर हेस्कॉमकडे तक्रारही केली. हेस्कॉम अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी त्या ठिकाणी जाऊन वीजप्रवाह सुरळीत करण्यासाठी त्या खांबावरील वीजवाहिनी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला. पण वीजवाहिनी जोडण्यास तो शेतकरी विरोध करत असल्याने हेस्कॉमचे कर्मचारी व अधिकारी देखील माघारी परतत आहेत. शेवटी माचाळी गावठाणमधील नागरिकांनी यासंदर्भात आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची भेट घेऊन वीजप्रवाह खंडित झाल्याने होत असलेल्या अडचणींची त्यांना सविस्तर माहिती दिली. खंडित वीजप्रवाहामुळे वसाहतीमधील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी पडणाऱया अंधारामुळे घराबाहेर पडणेदेखील मुश्कील होत असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आणून दिले.
आमदार अंजली निंबाळकर यांनी खानापूर हेस्कॉमच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून त्यांना धारेवर धरले. हेस्कॉमने वीजवाहिनीसाठी उभे केलेल्या खांबावर खासगी व्यक्ती कसा काय चढू शकतो? त्याला वीजप्रवाह खंडित करण्याचा अधिकार आहे का? यासंदर्भात त्या व्यक्तीवर कारवाई का करत नाही? त्याच्यावर कारवाई करण्यात हेस्कॉम हतबल का होत आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती करून कुठल्याही परिस्थितीत तेथील वीजप्रवाह सुरळीत करून त्या वसाहतीमध्ये होत असलेली पाण्याची अडचण दूर करावी. तसेच रात्रीच्यावेळी पडणारा अंधारही दूर करावा, असा स्पष्ट आदेश दिला.