मुंबई : आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळय़ासाठी श्री क्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळय़ावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. कोरोनाचे संकट पाहता मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्यावतीने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील 10 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ‘लालपरी’ धावणार आहेत. हा पालखी सोहळा नेत्रदीपक तसेच वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळ ” लालपरी” बसेस देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.
मागील वर्षी प्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाल्याबद्दल परब यांनी समाधान व्यक्त केले. 19 जुलै रोजी या बसेस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांनाना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थान विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आले आहेत.