मनसेचा थेट मातोश्री समोर बॅनर : शुभेच्छा देताना केली विचारणा
प्रतिनिधी / मुंबई
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेनेमध्ये जोरदार सवालजबाब सुरु आहेत. शुक्रवारीही मनसेने थेट मातोश्रीसमोर बॅनर लाऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देताना चांगलेच शाब्दिक चिमटे काढले आहे. उर्जामंत्री राऊत यांच्या विधानाचा खुबीने वापर करत वाढीव विजबिलाचा प्रश्न उपस्थित करत `मुख्यमंत्रीसाहेब, सरकार निर्दयी कसे झाले ? ‘ असा सवाल उपस्थित केला आहे.
बॅनरमध्ये म्हटले आहे की,
मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता एक वर्ष नवीन आले,
गोड बातमी तर दूर राहिली पण जनतेचे हाल झाले.
जनतेच्या खिशात पैसा नाहीतरी वीज बिल भरा उर्जामंत्री म्हणाले.
मुख्यमंत्रीसाहेब, सरकार इतके निर्दयी कसे काय झाले ?
अशी विचारणा केली आहे.
लॉकडाऊन काळातील वीज बिलावरुन मनसेने चांगलीच खिल्ली उडवत मुख्यमंत्र्यासह सरकारला विचारणा केली आहे. आधी माफ करणार म्हणून सांगितले, नंतर पैसा नाही म्हणाले, मात्र या सगळÎात गरीब जनता भरडतेय, याची आठवण करुन देण्यात आली. आधी आश्वासन दिलं, नंतर घुमजाव कशासाठी, अशी विचारणा करत मुख्यमंत्र्यांना वाढीव बिलांवर टिका केली आहे.
मनसेने प्रथम कोरोना काळातील वाढीव वीज बिल माफ करावे, अशी मागणी होती. परंतु त्यांना आश्वासनापेक्षाही काहीही मिळाले नाही. त्यामुळे थेट मातोश्री समोर बॅनर उभारुन मुख्यमंत्र्यांना टोचणी लावण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे.