खनिज वाहतुकीसाठीच लॉकडाऊन टाळात असल्याचा संशय व्यक्त
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. किडी-मुंग्यांप्रमाणे लोक मरत आहेत. अशा परिस्थितीत स्वतः आरोग्यमंत्री लॉकडाऊन करण्याची विनंती करत आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांचे काळीज पाझरत नाही यामागे खनिज वाहतूक हेच एकमेव कारण असू शकते, असा संशय शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केला आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर आणि सरचिटणीस मिलिंद गावस यांची उपस्थिती होती. जनतेप्रती अत्यंत भावनाशुन्य असे हे सरकार बनले असून मुख्यमंत्री एवढे असंवेदनशील कसे बनू शकतात? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विद्यमान सरकारातील अनेक आमदार-मंत्री खनिज वाहतूक व्यवसायात आहेत. सध्या खाण परिसरात उत्खनन करण्यात आलेल्या खनिजची बेसुमार वाहतूक सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत पावसापूर्वी शक्य तेवढय़ा खनिजाची वाहतूक करण्याकडे त्यांचा कल आहे. अशावेळी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यास ही वाहतूक बंद पडेल. परिणामी प्रचंड आर्थिक फटका बसेल, या भीतीपोटी येणाऱया दडपणातूनच मुख्यमंत्री लॉकडाऊन करण्यास नकार देत आहेत, असे कामत म्हणाले.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या महाभयंकर वेगाने वाढत आहे. गत तीन दिवसात रोज दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. तसेच रोज 20 ते 40 एवढय़ा संख्येने लोक मरत आहेत. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे भविष्यात मृतांची संख्या आणखीही वाढण्याची भीती आहे, म्हणुनच सर्व स्तरांतून लॉकडाऊनची मागणी होऊ लागली आहे. मात्र मुख्यमंत्री विविध कारणे देऊन ती मागणी सोयिस्कररित्या डावलत-नाकारत आहेत. यावरून त्यांना जनतेच्या हितापेक्षा खाणींची जास्त चिंता आहे, हेच स्पष्ट होत आहे, असे कामत म्हणाले.
यापूर्वी मुख्यमंत्री लॉकडाऊन टाळतात त्यामागे पॅसिनोचालकांचे दडपण असावे, असा संशय लोक घेत होते. परंतु सध्या पर्यटकांचे गोव्यात येणे बंद झाल्यामुळे पर्यटन व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. समुद्रकिनारे ओस पडू लागले आहेत. पॅसिनोंच्या परिसरातही पर्यटकांची वर्दळ कमी होत आहे. त्यावरून पॅसिनोंच्या हितासाठी लॉकडाऊन होत नव्हते हा संशय मागे पडून खनिज वाहतुकीसाठीच मुख्यमंत्री लॉकडाऊन करण्यास इच्छुक नाहीत, या संशयास ठाम पुष्टी मिळते, असे कामत म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यात समन्वय नसल्यामुळेच आरोग्यव्यवस्थेची आबाळ होत आहे. श्री. राणे काल एक बोलतात आणि दुसऱया दिवशी स्वतःचीच वक्तव्ये बदलतात, तर मुख्यमंत्री कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत नाहीत, यावरून त्यांचे एकमेकांशी पटत नाही का? असा संशयही कामत यांनी व्यक्त केला.
यापूर्वी महाराष्ट्र सरकारने गोव्याला संवेदनशील राज्य जाहीर केले होते, त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांवर गोव्याबद्दल ऍलर्जी असल्याचा आरोप केला होता. मात्र टीका करण्यापेक्षा आरोग्यमंत्र्यांनी त्या वक्तव्याची कारणीमिमांसा केली असती तर आजपर्यंत बळी गेलेल्या कित्येकांचे जीव वाचले असते, असे कामत म्हणाले.
गोव्याला संपूर्ण लॉकडाऊन परवडणारे नाही, त्यापेक्षा बाहेरून येणाऱयांवर कठोर निर्बंध घालावे ही आमची पूर्वीपासूनच मागणी होती, परंतु सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. उलटपक्षी आरोग्यमंत्री लोकांवरच आरोप करत आहेत, रुग्ण शेवटच्या क्षणी इस्पितळात येत असल्यामुळे योग्य उपचारांअभावी मृत्यू होतो. हा मृत्यूदर वाढण्यास लोकच जबाबदार आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र हा दावा सपशेल खोटा आहे. कोविड तपासणी केंद्रांवरील गर्दी पाहता लोक तेथे जाण्यास घाबरत आहेत. त्याशिवाय प्रत्यक्ष अहवाल येण्यास तीन-चार दिवस लागतात. तोपर्यंत एखादा बाधितही मुक्तपणे सर्वत्र वावरत असतो. त्यातून संसर्ग पसरत जातो. ही परिस्थिती बदलण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकार स्वतःच्या सोयीनुसार कोरोनाचा वापर करत आहे. स्वतःसाठी एक नियम आणि जनतेसाठी दुसरा, अशी सरकारची कार्यशैली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा वाढदिवस साधेपणाने केल्याचे नाटक केले आणि दुसऱयाच दिवशी एका सिग्नल यंत्रणेच्या उद्घाटनसाठी प्रचंड गर्दीत सहभागी झाले. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच लोकांचा सरकारवरील विश्वास संपलेला आहे, असे कामत म्हणाले.
खरे तर ही तपासणी प्रत्येकाच्या घरी जाऊन करणे आवश्यक आहे. तसेच झाले तरच संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. त्याशिवाय थोडय़ा दिवसांचे तरी अंशतः लॉकडाऊन करणे आवश्यक आहे, असेही कामत यांनी सूचविले.