ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यावर देशातील तरुणांना 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील 14 कोटी लोकांचे रोजगार गेले, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
आज युवा काँग्रेस स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. राहुल यांनी ट्विटरवर यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.
राहुल यांनी या व्हिडिओत म्हटले आहे की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी दर वर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे तरुणांना वचन दिले होते. मात्र, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे 14 कोटी लोक बेरोजगार झाले. नोटबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी आणि सध्याचे लॉकडाऊन या तिन्ही गोष्टींनी देशाची आर्थिक संरचना बदलली. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे.
युवा काँग्रेस मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवणार आहे. रोजगारासाठी रस्त्यावर उतरणार आहे. राहुल गांधी यांनी देशभरातील तरुणांना ‘रोजगार दो’ मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे.