वृत्तसंस्था/ कोलंबो
भारतीय संघातील कृष्णाप्पा गौतम आणि यजुवेंद्र चहल कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना आणखी काही दिवस लंकेमध्ये आपले रहावे लागेल. तीन सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघाने त्वरित कोलंबोतून मायदेशी प्रयाण केले.
लंकेमध्ये के. गौतम, यजुवेंद्र चहल आणि अष्टपैलू कृणाल पांडय़ा हे सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. भारतीय संघ चार्टर फ्लाईटने कोलंबोतून बेंगळूरकडे रवाना झाला. भारताच्या या तीन खेळाडूंना सात दिवसांसाठी लंकेमध्ये आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांची पुन्हा कोरोना चाचणी घेतली जाईल. लंकेच्या दौऱयात भारताच्या एकूण 9 क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली. यामध्ये हार्दिक पंडय़ा, मनीष पांडे, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ आणि दीपक चहर यांचाही समावेश आहे. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हे कोलंबोतूनच थेट लंडनला रवाना होणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेले अवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर जखमी झाल्याने त्यांच्या जागी सूर्यकुमार यादव आणि शॉ यांना निवडण्यात आले आहे.