रस्ते परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय : 120 दिवसांत पूर्ण होणार प्रक्रिया
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते दुर्घटनेनंतर मिळणाऱया भरपाईसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. पीडित कुटुंबाला भरपाईसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार नाही. मंत्रालयाने रस्ते दुर्घटनेनंतर सर्वप्रकारच्या प्रक्रियांसाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. संबंधित यंत्रणेला या कालमर्यादेत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. नवा निर्णय 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. रस्ते अपघातानंतर भरपाईसाठी न्यायालयाच्या फेऱया माराव्या लागणाऱया पीडित कुटुंबांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे. तसेच वाहन विम्यात वाहनमालकाचा मोबाईल क्रमांक देखील अनिवार्य करण्यात आला आहे.
रस्ते परिवहन मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार 120 दिवसांमध्ये भरपाईची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यात 90 दिवसांच्या आत विस्तृत दुर्घटना अहवाल तयार करावा लागेल, त्यानंतर 30 दिवसांच्या आत विमा कंपनी स्वतःची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. अशाप्रकारे 120 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक जिल्हाधिकाऱयाला रस्ते दुर्घटनांमध्ये पीडितांना भरपाई मिळवून देण्यासाठी एका अधिकाऱयाची नियुक्ती करावी लागेल. पोलिसांनी रस्ते दुर्घटनेच्या 48 तासांच्या आत एएआर आणि फर्स्ट ऍक्सिडेंट रिपोर्ट लिहावा लागणार आहे.
हिट अँड रन प्रकरणी मृत्यू झाल्यास सरकारकडून निर्धारित किमान 2 लाख आणि गंभीर जखमी झाल्यास 50 हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. या भरपाईसाठी कुठल्याही प्रकारचे उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागणार नाही. सरकारकडून निश्चित भरपाई प्राप्त केल्यावरही पीडित न्यायालयात धाव घेऊ शकतो.
सरकारच्या निर्णयामुळे भरपाई मिळवून देणाऱया मध्यस्थांची भूमिका संपणार आहे. याचबरोबर विम्याशी मोबाइल क्रमांक लिंक केल्याने वाहनाचा मालक शोधून काढणे सोपे ठरणार आहे.