प्रतिनिधी/ पणजी :
जोरदार पावसासहित मान्सूनने संपूर्ण गोवा पादाक्रांत करून महाराष्ट्रात प्रवेश केला. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी काल गुरुवारी राज्यात सुमारे 2 इंच पावसाची नोंद झाली. पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यभरात सर्वत्र शेतीची कामे सुरु झाली आहेत.
राज्यात थोडय़ा विलंबाने मान्सूनचे आगमन झाले. पणजी वेधशाळेने गोव्यात मान्सून पोहोचल्याचे दुपारी जाहीर केले. निसर्ग चक्रीवादळामुळे नियोजित मान्सूनचे गोव्यात आगमन लांबले होते आणि तो कारवार जिह्यातच स्थिरावला होता.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटकमार्गे पाऊस गोव्यात पोहोचलेला व तो कारवार येथे स्थिरावलेला. नंतर मान्सूनला पुढे सरकण्यास मदत झाली आणि राज्यात बुधवारपासून जोरदार पाऊस पडला. मान्सूनने पहिल्याच दिवशी सकाळी जोरदार पाऊस आणला व दुपारनंतर पावसाचा वेग मंदावला.
रविवारपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस
हवामान खात्याने रविवार 14 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या दरम्यानच्या काळात वादळीवारे वाहू लागेल. प्रसंगी वाऱयाचा वेग ताशी 40 ते 50 कि. मी. या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातही जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता गृहित धरून मच्छीमाऱयांना खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आलेला आहे.
पणजीत गुरुवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान पावसाची नोंद 12 मि. मी. एवढी झाली, तर गेल्या 24 तासात एकूण 57.4 मि. मी. एवढा पाऊस पडला. गेल्या 24 तासात राज्यात सर्वत्र जोरदार गडगडासह पाऊस पडला. शेतकरीवर्ग या पावसाने समाधानी झाला आहे. राज्यात आता शेतीची कामे सुरू झाली. यंदाच्या मोसमात एकूण 309.7 मि. मी एवढा पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत तो 3.5 इंच जादा आहे.