वाल्मिकी जयंती प्रा. डॉ. निंगाप्पा मादण्णार यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
रामायण संपूर्ण मानवकुळासाठी आदर्श आहे. या महाकाव्यात प्रत्येक समस्येचे निवारण आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आहेत, असे निपाणी येथील व्ही. एस. एम. कॉलेजचे प्रा. डॉ. निंगाप्पा मादण्णावर यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आदीकवी महषी वाल्मिकी जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
महषी वाल्मिकींना एकाच समुदायासाठी जखडून ठेवू नये. त्यांचे तत्व, आदर्श प्रत्येकांनी अनुकरण करण्यासारखे आहे. रामराज्याची संकल्पना वाल्मिकी रामायणातून आलेली आहे. केवळ एकाच समुदायाला विकसित होता येत नाही. सर्व जण एकत्रीत आले तरच विकास होणार आहे. भारत हाच आमचा धर्म आहे. राज्यघटना आमचा धर्मग्रंथ आहे. अंधश्रध्दा झुगारुन विकासाच्या वाटेवर वाटचाल करण्याची गरज आहे, असेही डॉ. निंगाप्पा मादण्णावर यांनी सांगितले.
यावेळी चरमूर्ती चरंतेश्वर विरक्त मठाचे शरणबसव देवरु, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबले, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, जिल्हाधिकारी एम. डी. हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पालिका आयुक्त जगदेश के. एच., समाज कल्याण खात्याच्या डॉ. उमा सालीगौडर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी किल्ला तलावाजवळील चौकात वाल्मिकी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.