प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने रस्त्यांची वाताहत झाली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱया रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. श्रीनगर उद्यानाजवळ शहराच्या प्रवेशद्वारावरच खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गाशेजारी शहरात प्रवेश करण्यासाठी सर्व्हिस रोड निर्माण करण्यात आले आहेत. श्रीनगर उद्यानाजवळ असलेल्या सर्व्हिस रोडशेजारील गटारी पूर्णपणे बुजल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. परिणामी श्रीनगर उड्डाणपुलाशेजारी सर्व्हिस रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. संपूर्ण रस्ता खराब झाल्याने शहरात येणाऱया नागरिकांना खड्डय़ांचा सामना करावा लागत आहे. सदर रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून सांडपाणी साचत असून, वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नाही. सदर रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाची आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून याबाबत कोणतीच कारवाई केली जात नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळानेदेखील या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केला आहे. परिणामी येथील रस्ता खराब झाला आहे. शिवबसवनगर व धर्मनाथ भवनकडून श्रीनगरकडे जाणाऱया वाहनधारकांना खड्डय़ांमधून कसरत करत ये-जा करावी लागत आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला असून, त्यामध्ये सांडपाणी साचत असल्याने पादचाऱयांच्या तसेच दुचाकी वाहनचालकांच्या अंगावर उडत आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून, आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील सांडपाणी वाहण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवून खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.