राहुल गांधींचे ‘ब्रेकफास्ट पॉलिटिक्स’
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत ‘ब्रेकफास्ट’ मीटिंग केली आहे. कॉन्स्टिटय़ूशन क्लबमधील या बैठकीत 14 राजकीय पक्षांचे नेते सामील झाले. या बैठकीत राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी संसदेत सरकारची कोंडी करण्याच्या रणनीतिवर चर्चा केली आहे. बैठक संपल्यावर राहुल गांधी वाढत्या महागाईचा निषेध म्हणून सायकल चालवून संसदेत पोहोचले. राहुल गांधी यांचे विरोधी पक्षाच्या अन्य नेत्यांनीही अनुकरण केले आहे.
या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राजद, सप, भाकप, माकप, आययुएमएल, आरएसपी, केरळ काँग्रेस (एम), झामुमो, नॅशनल कॉन्फरन्स, तृणमूल काँग्रेस आणि लोकतांत्रिक जनता दल सामील झाले. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासह पेगॅसस हेरगिरी प्रकरणासारख्या मुद्दय़ांवर संसदेत सरकारची कोंडी करण्याची रणनीति आखणे हा या बेकफास्ट पॉलिटिक्सचा उद्देश होता.
लोकांचा आवाज एकजूट करा
लोकांचा आवाज जितका एकजूट होईल, तितकाच तो प्रभावी ठरणार आहे. भाजप-संघाला मग हा आवाज दडपणे अवघड जाणार असल्याचे राहुल यांनी या बैठकीत बोलताना म्हटले आहे. डाव्या पक्षांनी सरकारविरोधात भूमिका मांडण्यासाठी सभागृहाबाहेर प्रतिसंसद चालविण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण सर्व विरोधी पक्ष यावर सहमत झाले नाहीत. विरोधी पक्ष पेगॅसस स्पायवेयरद्वारे झालेल्या कथित हेरगिरीच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीत चौकश करण्याची मागणी करत आहेत. तर सरकारने विरोधी पक्षांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
विखुरलेले विरोधक
राहुल गांधी यांच्याकडून आयोजित या बैठकीपासून अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि मायावतींया बसपने मात्र अंतर राखले आहे. तसेच काही राजकीय पक्षांनी देखील राहुल गांधी यांच्या बैठकीत सामील होणे प्रकर्षाने टाळले आहे. विरोधी पक्षांचा चेहरा होण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी चालविला आहे. पण तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आता राष्ट्रीय पातळीवर सक्रीय होऊ लागल्याने राहुल गांधी राजकारणात आक्रमक झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.