जिल्हा पंचायतीकडे शेतकऱयांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर, मच्छे, देसूर, सुळगे, झाडशहापूर या गावांच्या शिवारामधून रेल्वेमार्ग जातो. शेतामध्ये ये-जा करण्यासाठी अनेक वर्षांपासून
ट्रकच्या दोन्ही बाजूने रस्ते आहेत. परंतु हे रस्ते मागील पावसाने खराब झाले आहेत. त्यातच रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणामुळे जुने रस्ते माती टाकून बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन टॅकच्या बाजूने शेतकऱयांसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राजाराम कालकुंद्रीकर यांनी जिल्हा पंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगाव ते लोंढा हा रेल्वेमार्ग येळ्ळूर, मच्छे, देसूर, सुळगे, झाडशहापूर या गावच्या शेतामधून जातो. शेतकऱयांच्या सोयीसाठी काही ठिकाणी डांबरी तर काही ठिकाणी कच्चे रस्ते केले होते.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे यातील बरचसे रस्ते वाहून गेले आहेत. काही रस्ते ढासळले आहेत. त्यातच बेळगाव ते देसूर यादरम्यानच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. रेल्वेमार्गाची रुंदी वाढविली जात असल्याने दोन्ही बाजूंनी माती टाकण्यात येत आहे. यामुळे वर्षानुवर्षे शेतवडीकडे जाणारे रस्ते बुजविले आहेत. आता रस्ते नसल्यामुळे शेतामध्ये ये-जा करणे शेतकऱयांना डोकेदुखी ठरत आहे. शेतीमध्ये घेतलेले उत्पादन ने-आण करण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पावसाळय़ात तर शेती करणेही कठीण होणार आहे. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी नव्याने सर्व्हिस रोड करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
झाडशहापूर-भालेरावनगर येथील 16 फुटी रस्ता शेतकऱयांसाठी सोयीचा ठरतो. या रस्त्याचा वापर आसपासच्या शिवारातील शेतकरी करतात. टॅक्टर, बैलगाडय़ा, दुचाकी या रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी आर. डी. कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे जिल्हा पंचायत सीईओंकडे केली आहे.