बुथ पातळीवर टास्क फोर्स कमिटी स्थापणार :
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व तऱहेचे प्रयत्न करण्यात येत असून राज्य सरकारने नवी मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण, इतर कोणतेही आजार नसणारे आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोरोनाबाधितांना होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) केले जाणार आहे. शनिवारपासून या मार्गसूचीची अंमलबजावणी होणार आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी पत्रकार परिषदेत नव्या मार्गसूचीबाबत घोषणा केली. कोविड टास्क फोर्सच्या बैठकीप्रसंगी तज्ञांनी कोरोना नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱया उपाययोजनांबाबत अहवाल सादर केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार होम आयसोलशनमध्ये असणाऱयांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कॉलसेंटर स्थापन करण्यात येईल. कोरोनाची लक्षणे नसणारे, इतर आजार नसणारे व 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाधितांना घरीच विलगीकृत करता येईल. तत्पूर्वी तशा व्यक्तींची आरोग्य पथक संबंधिताच्या घरी जाऊन तपासणी करणार आहे. स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह असेल तरच होम आयसोलशनची शिफारस केली जाणार आहे. दरम्यान, त्या व्यक्तीची देखभाल करण्यासाठी एक व्यक्ती असलाच पाहिजे, असे मार्गसूचीमध्ये उल्लेख आहे.
एखाद्या वेळेस घरामध्ये या व्यवस्था नसतील तर कोविड केअर सेंटरमध्ये बाधिताला दाखल करता येणार आहे. तपासणी खोकला, सर्दी, श्वसनासंबंधी विकार, रक्तदाब, मधूमेह, ताप, मूत्रपिंड विकार याबाबतची माहिती जमा केली जाणार आहे. यापैकी गंभीर आजार असल्यास त्या बाधितांना घरात उपचार करण्याबाबत शिफारस केली जाणार आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱयांची आरोग्य अधिकाऱयांनी दररोज तपासणी करावी. संसर्गमुक्त झाल्यानंतर होम आयसोलेशनमधून बाहेर पडण्याबाबत इस्पितळांप्रमाणे प्रोटोकॉलची आवश्यकता असणार आहे.
होम आयसोलशन असणाऱयांसाठी क्वारंटाईन नियम
होम आयसोलेशनमध्ये असणाऱयांना 17 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. 10 दिवसांत सर्दी, खोकला, ताप नसल्यास बाधित व्यक्ती संसर्गमुक्त झाला आहे, असे समजण्यात येणार आहे. त्यांना कोरोना चाचणीची आवश्यकता नाही. जर वरील लक्षणे असल्यास पुन्हा 7 दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे.
होम आयसोलेशन असणाऱयांनी सक्तीने 8 तास एन-95 मास्क परिधान करावा, घरातील व्यक्तींपासून 2 मीटर अंतर राखावे, उकळून थंड केलेले पाणी प्यावे, हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत. धुम्रपान, मद्यपान, तंबाखूसेवत करू नये, आरोग्य सेतूचा वापर करावा, असेही मार्गसूचीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामीण आणि शहरी भागात कोविड नियंत्रणासाठी बुथ तापळीवर टास्क फोर्स कमिटी नेमण्यात येईल. या कमिटीत स्थानिक नेते, आरोग्य खात्याचे कर्मचारी, पोलीस, लाईनमन व स्वयंसेवकांचा समावेश राहणार आहे. बेंगळूरमध्ये असणार 8800 कमिटय़ा स्थापन केल्या जाणार आहेत, अशी माहिती डॉ. सुधाकर यांनी दिली.