ऑनलाईन टीम
केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात उत्तर प्रदेशमधील लखिमपूर खेरी येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आले. या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली असून सध्या त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या घटनेच्या निषेधार्थ काल, सोमवारी (दि.11) महाराष्ट्र बंद पुकारला होता.
दरम्यान, लखीमपूर खेरी प्रकरणी राहुल गांधी उद्या, बुधवारी (१३ ऑक्टोबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती कोविंद यांच्याशी लखीमपूर खेरी घटनेवर चर्चा करतील.
केंद्राच्या तीन कृषी शेती कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी मंगळवारी लखीमपूर खेरी हिंसाचारात आपला जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘शहीद किसान दिवस’ पाळत आहेत. दरम्यान, प्रियंका गांधी टिकोनिया गावात पोहोचल्या असून त्यांनी मृत शेतकरी आणि पत्रकार रमण कश्यप यांना आदरांजली वाहिली.