स्पष्ट निर्देश नसल्याने गोंधळाची स्थिती : वाहनचालकांना होतेय नुकसानी, मनस्ताप
प्रतिनिधी /मडगाव
वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याने अनेक वाहनचालकांना चार-पाच महिन्यांपूर्वी दंड देण्यात आला होता. मात्र, हा दंड भरण्यासाठी संबंधित वाहनचालकांना आता कळविण्यात आले आहे. हा दंड भरण्यासाठी पोलीस स्थानकावर गेल्यास दंड पूर्वीच्या दराने आकारायचा की, नव्या दराने हे पोलीस अधिकाऱयांना स्पष्टपणे माहिती नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
नवीन वाहतूक कायदा अस्तित्वात आल्यानंतर दंडाच्या रक्कमेत प्रचंड वाढ करण्यात आलेली आहे. पूर्वी जमतेम रक्कम होती. चार-पाच महिन्यांपूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनचालकांना आता दंड भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस घेऊन वाहनचालक मडगाव पोलीस स्थानकाला भेट देतात.
कर्मचारी गोंधळात, वाहनचालक त्रासात
नियमभंगाचा दंड कोणत्या दराने आकारावा हे स्पष्ट करण्यात आले नसल्याने पोलीस स्थानकावरील कर्मचारी वाहनचालकांना माघारी पाठवितात. त्यामुळे वाहनचालकांनी दंड भरण्यासाठी हेलपाटे का मारावेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय दंडात्मक कारवाई ही चार-पाच महिन्यापूर्वीची असून त्याबाबतच्या नोटिसा त्याचवेळी का बजावल्या नाहीत? असाही सवाल आहे. वास्तविक हा दंड पुर्वीचा असल्याने जुन्या दरानेच दंड आकारणे आवश्यक आहे. मात्र, जुन्या दराने दंड आकारणे बंद झाल्याने येथील कर्मचारीवर्ग गोंधळून गेलेला आहे.
निवडणुकीमुळे प्रलंबित राहिल्या होत्या नोटिसा
चार-पाच महिन्यांपूर्वी वाहतूक नियमाचे उल्लंघन केलेल्या वाहनचालकांना नोटीस बजावण्यात आली नव्हती. आत्ता या नोटीसा बजावल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे या नोटिसा बजावण्याचे राहून गेल्याचे पोलीस कर्मचारी सांगतात. यात वाहनचालकांचा काहीच दोष नाही. चार-पाच महिन्यानंतर दंड भरण्यासाठी नोटीस बजावणे व दंड भरण्यासाठी गेल्यास दंड जुन्या की नव्या दराने आकारावा हे स्पष्ट नसल्याने वाहनचालकांना दंड न भरताच माघारी फिरावे लागते. त्यामुळे वाहनचालकांचे नुकसान होत असून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाहतूक मुख्यालयाचा कारभार सुस्त
नियमभंगाचा दंड जुन्या की नव्या दराने आकारवा, हे स्पष्ट करावे यासाठी वाहतूक पोलीस विभागाने पणजी मुख्यालयाकडे पत्र व्यवहार केलेला आहे. पण, अद्याप मुख्यालयाने या पत्राची दखल घेतलेली नाही. त्यामुळे दंडात्मक कारवाई संदर्भातील गोंधळ मात्र, कायम आहे.