रस्त्याची दुरवस्था झाली तरी दुर्लक्षच : नव्याने समाविष्ट केलेल्या उपनगरांमधील रस्त्यांकडे कानाडोळा
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर आणि उपनगरांतील असंख्य रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. मात्र नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या उपनगरांमधील रस्त्यांच्या विकासाकडे महापालिका प्रशासनाने आणि स्मार्ट सिटी कंपनीने कानाडोळा केला आहे. त्यामुळेच विजयनगर पाईपलाईन रोडची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला कोणी वाली आहे का? अशी विचारणा होत आहे.
1 हजार कोटी निधी खर्चून स्मार्ट सिटी बनविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. मात्र बहुतांश रस्त्यांचा विकास झाला नसल्याने दुरवस्था झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केवळ मुख्य रस्त्यांचा विकास करून दिखाऊपणा करण्यात आला आहे. महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्यांचा विकास करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेषतः महापालिकेत अलीकडेच समाविष्ट करण्यात आलेल्या उपनगरांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पण अशा रस्त्यांचा विकास करण्याच्यादृष्टीने कोणतीच दखल घेण्यात आली नाही.
विजयनगर, सिंधी कॉलनी, कंग्राळी परिसरातील काहीभाग असा विविध परिसर 2006 मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. पण या भागातील रस्त्यांचा विकास करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. विजयनगर परिसरातील पाईपलाईन रोड हा रस्ता खूपच महत्त्वाचा असून या रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. रामघाट रोड आणि बेळगाव-वेंगुर्ला रोडला जोडणारा हा रस्ता असल्याने वाहनधारकांना सोयीचा आहे. तसेच या रस्त्याशेजारी हिंडलगा पपिंग स्टेशन ते लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्राला जोडणारी जलवाहिनी घालण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याचा विकास करणे गरजेचे आहे. पण मनपाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
वाहने नियंत्रित करताना करावी लागतेय कसरत
काही ठिकाणी रस्ता उखडल्याने पेव्हर्स घालून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण पेव्हर्सदेखील निघाल्याने रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्याला उतार असल्याने खड्डय़ांमध्ये वाहने नियंत्रित करताना कसरत करावी लागते. काहीवेळा दुचाकी वाहने घसरून अपघात घडतात. त्यामुळे या रस्त्याचा विकास करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येते. मात्र महापालिका प्रशासनाने रस्त्याच्या विकासाकडे कानाडोळा केला आहे. रस्त्याच्या जागेची मालकी महापालिकेची असून महापालिकेने रस्त्याचा विकास करावा, अशी मागणी होत आहे. पण स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्याला कोणी वाली आहे का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.