पथदिपांची चुकतेय वेळ : सातत्याने तक्रारी करूनही मनपा अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहर व उपनगर परिसरातील नादुरुस्त दिवे दुरुस्त करण्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील पथदीप सुरू-बंद करण्यासाठी सेन्सर बसविण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ते कोल्हापूर क्रॉस आणि अशोक चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या रस्त्यावरील पथदीप सुरू-बंद करण्याची वेळ चुकली आहे. परिणामी हे दिवे दिवसा सुरू आणि रात्री बंद राहत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
सध्या शहरात कोरोनाची धास्ती असून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याकरिता ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे वाहनधारक भंगीबोळसह लहान रस्त्यांचा आधार घेत आहेत. पण शहर व उपनगरांतील बहुतांश पथदीप बंद असल्याने शहर अंधाराच्या विळख्यात सापडले आहे. महापालिका व्याप्तीमधील पथदिपांच्या देखभालीचे काम कंत्राटी पद्धतीने दिले आहे. पण कंत्राटदाराकडून देखभालीचे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पथदीप बंद आहेत. मात्र, दुरुस्तीकडे कानाडोळा केला जात आहे. संचयनी चौक ते गोगटे चौकपर्यंतचे पथदीप, कॉलेज रोड, डॉ. बी. आर. आंबेडकर रोड, काँग्रेस रोड, बसवेश्वर चौक ते बॅ. नाथ पै चौकपर्यंतच्या आनंदवाडी रोडवरील, बॅ. नाथ पै चौक ते वडगाव पिंपळकट्टा चौकपर्यंतच्या रस्त्यांवरील पथदीप बंद अवस्थेत आहेत.
विशेषतः या सर्व रस्त्यांवर विकासकामे राबविण्यात येत असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. अशातच रस्त्यांवर अंधार पसरल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे मुश्कील बनले आहे. रस्त्यांची व पथदिपांची दुरुस्ती करण्याबाबत तक्रारी करूनही महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. पथदिपांच्या दुरुस्तीकरिता महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर अनेकवेळा तक्रार करूनही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे काही ठिकाणी खड्डय़ांमुळे वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पथदिपांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय महामार्ग ते अशोक चौक आणि राष्ट्रीय महामार्ग ते कोल्हापूर व राणी चन्नम्मा चौकपर्यंतच्या रस्त्यांवरील पथदीप बंद आहेत. सदर पथदिपांबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. या मार्गावरील पथदीप सेन्सरद्वारे सुरू-बंद होतात. पण हे पथदीप दिवसभर सुरू असून रात्रीच्या वेळी बंद राहत आहेत. त्यामुळे पथदीप सुरू-बंद होण्याची वेळ चुकली असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे नगरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
खानापूर रोडवर अंधाराचे साम्राज्य कॅन्टोन्मेंट बोर्डचा कानाडोळा
कॅन्टोन्मेंट हद्दीत येणाऱया रस्त्यांवरील पथदीप बंद असून वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱया खानापूर रोडवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. पण खानापूर रोडशेजारी ग्लोब थिएटर मागील बाजूस असलेल्या मैदानावरील पथदीप अनावश्यक रात्रंदिवस सुरू ठेवले आहेत. पण कॅन्टोन्मेंट हद्दीतील हायमास्ट आणि पथदीप बंद आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डने विविध चौकात हायमास्ट बसविले आहेत. पण सदर हायमास्ट सदैव बंदच असतात. मिलिटरी विनायक मंदिर ते अरगन तलावापर्यंतच्या बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील पथदीप, क्लब रोड, रामघाट रोड, कम्प परिसर अशा विविध रस्त्यांसह ठिकठिकाणचे पथदीप बंद असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.