ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताने नेहमीच शेजारी राष्ट्रांना सहकार्य करत मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत. भारताने कोणत्याही देशाला डिवचण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, कोणी आक्रमण केले तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यासाठी भारत सक्षम आहे. काल लडाख सीमेवर झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पूर्व लडाखच्या सीमावादावरून झालेल्या भारत-चीन संघर्षावरही भाष्य केले.
मोदी म्हणाले, भारताने नेहमीच शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत. अनेकदा मतभेद झाले, पण भारताने कोणाला डिवचण्याचा प्रयत्न केला नाही. पण कोणी आक्रमक केले तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. आपल्या देशाच्या अखंडता आणि सार्वभौमत्वासोबत आम्ही तडजोड करत नाही. जेव्हा कधी वेळ आली आहे आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले आहे. आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत.
देशाची रक्षा करण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. कोणी आक्रमण केले तरी त्यांना प्रत्युत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असे मोदींनी म्हटले आहे.