शाहीन बाग खाली करा, जय श्री राम अशा दिल्या घोषणा : रस्ता मोकळा करण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मागील 50 दिवसांपासून शाहीन बागमध्ये एका गटाकडून निदर्शने सुरू आहेत. पण रविवारी पहिल्यांदाच शाहीन बागच्या निदर्शनांच्या विरोधात स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. शाहीन बागमधील निदर्शकांनी नोएडा आणि कालिंदी कुंजला जोडणाऱया रस्त्यावर कब्जा केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या प्रकाराच्या विरोधात शेकडोंच्या संख्येत पोहोचलेल्या आंदोलकांनी ‘शाहीन बाग खाली करा’, ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या आहेत.
दिल्ली पोलीस अधिकाऱयांनी आंदोलनस्थळी धाव घेत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पण आंदोलनात सामील महिलांनी वंदे मातरम्, जय श्री राम आणि शाहीन बाग खाली करा अशा घोषणा दिल्या आहेत. रस्ता मोकळा करण्याची आमची मागणी आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात एका गटाकडून मागील 50 दिवसांपासून निदर्शने सुरू असल्याने स्थानिकांना त्रास होतोय, अशी तक्रार एका महिलेने केली आहे.
पोलिसांच्या बॅरिकेडिंगमुळे शाहीन बागमध्ये जाता येत नाही. शनिवारच्या गोळीबाराच्या घटनेनंतर तेथील तपासणी आणखीन वाढली आहे. स्वतःचे ओळखपत्र दाखविल्याशिवाय तेथून जाऊ दिले जात नसल्याची तक्रार स्थानिक रहिवासी दीपक पटेल यांनी केली आहे.
शाहीनबाग निदर्शकांसमोर त्यांच्या विरोधात आंदोलक जमा झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक बसेसमध्ये भरून लोकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. दोन्ही गटांमध्ये संघर्ष होऊ नये, याकरता पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एका 25 वर्षीय युवकाने शनिवारी शाहीन बागमध्ये गोळय़ा झाडल्या होत्या. या गोळीबारात कुणीच जखमी झाला नव्हता. पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले असून उपराज्यपाल अनिल बैजल यांनी पोलिसांना या भागातील सुरक्षा वाढविण्याचे निर्देश दिले होते. पोलीस आता स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने शाहीन बाग येथे जाऊ पाहणाऱया लोकांची झडती घेत आहे. या प्रकारामुळे त्रस्त लोकांनी शाहीन बागच्या घेराओला विरोध केला आहे.
नोकरदारांना होतोय त्रास
शाहीनबागमधील निदर्शनांमुळे स्थानिक लोकांना कामाच्या ठिकाणी जाणे अवघड ठरत चालले आहे. अधिक प्रवासभाडे तसेच इंधनासह प्रवासाचा कालावधीही वाढला आहे. कुणी आजारी पडल्यास रुग्णाला रुग्णालयात पोहोचविणे अवघड ठरले आहे. शाहीन बागमधील निदर्शनांमुळे नोएडा येथे नोकरीस जाणाऱयांना 5 तासांचा प्रवास करावा लागत आहे. या कारणामुळे अनेक जण मागील दीड महिन्यांपासून सुटीवर आहेत. मदनपूर खादर गावातील कोंडीमुळे लोकांना घरातून बाहेर पडणेही नकोसे झाले आहे.
छोटय़ा प्रवासासाठी कित्येक तास
शाहीन बागमधील निदर्शनांमुळे दिल्ली-नोएडा-फरीदाबाद येथे ये-जा करणाऱया लाखो लोकांना कित्येक किलोमीटरची प्रदक्षिणा घालावी लागत आहेत. तर हा मार्ग बंद झाल्याने रिंग रोड, मथुरा रोड आणि डीएनडीवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येत आहे. या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.