प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील नाटय़ रसिक मंडळींना चांगल्या दर्जाचे शाहु कला मंदिर उपलब्ध व्हावे यासाठी स्वतः नगराध्यक्षा माधवी कदम यांनी गेली साडेतीन वर्ष प्रयत्न करुन काम करवून घेतले. अभिनेते गिरीश ओक यांच्यासह मान्यवर अभिनेत्यांच्याकडून काय काय सुधारणा करता येतील हे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सूचना मागवून घेऊन तसे तंत्रज्ञान बसवणाऱयाकडून काम करवून घेतले. तब्बल साडेतीन वर्षानंतर पुन्हा सातारचे शाहु कलामंदिर सेवेत दाखल झाले तेही एका ऐतिहासिक अशा नाटकानेच. खासदार उदयनराजेंच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख आकर्षण रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक माधव पटर्वधन व देवमाणुसमधील सरु आज्जी होत्या.
शाहु कलामंदिराच्या नवीन डागडुजीच्या लोकार्पण सोहळय़ावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक वसंत लेवे, निशांत पाटील, अभिनेते माजी नगरसेवक कल्याण राक्षे, रंगकर्मी तुषार भद्रे, सूत्रसंचालक व जिल्हा बँकेचे कर्मचारी सुजित शेख, स्वीकृत नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, पंकज चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले, शाहु कलामंदिरात आल्यानंतर म्हणतात ना डोळय़ाचे पारणे फिटले असे काम झाले आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. कॉलेजमध्ये असताना कॉलेजमध्ये असा कार्यक्रम पहायला गेलो की टाळय़ा काय असतात ते पाहिले आहे. पंकज, तुषार यांच्यासारख्या रंगकर्मीचे स्वप्न साकार झाले बस, नादच नाही पाहिजे, असे गौरवोदग्रा त्यांनी काढले. त्यांच्या प्रत्येक शब्दाला टाळयांचा पाऊस पडत होता.
‘घाशीराम कोतवाल’ नाटकास प्रतिसाद
खासदार उदयनराजेंची एन्ट्री होताच फटाक्यांची आतषबाजी शाहु कलामंदिर परिसरात करण्यात आली. त्यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले तर दीपप्रज्वलन करुन ऐतिहासिक असे घाशिराम कोतवाल या नाटकाचा प्रयोग झाला. त्या प्रयोगास सातारकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
नगराध्यक्षा माधवी कदम यांचे प्रयत्न सार्थकी
नगराध्यक्ष माधवी कदम यांना काम करताना अनेक अडचणी आल्या. अगदी सातारा विकास आघाडीमधील काही मंडळींनीही आडकाठी निर्माण केली. परंतु सुशिक्षीत आणि सुंस्कृत घराण्यातील त्या असल्याने कोणाच्या आरोपांना कोणाच्या खेळय़ांना त्या नमल्या नाहीत. सातारकरांच्या भल्यासाठी आणि आघाडीचे नेते खासदार उदयनराजेंच्यासाठी त्यांनी शाहु कलामंदिराचे काम चांगले आणि दर्जेदार कसे होईल यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक बाबींकडे त्यांनी स्वतः लक्ष दिले. परंतु याचा कुठेही गवगवा व पराचा कावळा त्यांनी केला नाही. त्यांच्या प्रयत्नांना यश आले अन् तब्बल साडेतीन वर्षानंतर हे शाहु कलामंदिर पुन्हा सातारकरांच्या सेवेत रुजू झाले त्याचा आनंद कलाप्रेमींच्या चेहऱयावर दिसून येत असल्याने त्यांच्या कामाची पोहोचपावतीच मिळाल्याची चर्चा सुरु होती.