प्रतिनिधी/ सातारा
शाहूनगर आणि शाहूपुरी या दोन्हीमधील नागरी वसाहती, सातारा शहराचे अविभाज्य भाग आहेत. शाहूनगर भाग तर त्रिशंकु म्हणून ओळखला जात होता. शाहूपुरीकरांसाठी 24 बाय 7 पाणी योजना पूर्णत्वास जात आहे, त्यामुळे शाहूनगर मधील रहिवाशांसाठीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुमारे 28 कोटी रुपयांची नळपाणीपुरवठा योजना नगरोथ्थान योजनेमधुन प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी नगरपरिषदेचा 25 टक्के वाटा आणि 75 टक्के वाटा राज्यशासनाचा राहणार आहे. लवकरच ही योजना मार्गी लावून, शाहूनगर, विलासपूर, गोळीबार मैदान, पिरवाडी असा संपूर्ण त्रिशंकू भागातील सर्व कुटुंबांना सन 2054 सालची लोकसंख्या विचारात घूवन दरडोई 135 लिटर पाणीपुरवठा नियमितपणे होण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात खासदार उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, शाहूनगर या भागाला स्वतंत्र ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्था नसल्याने, नागरी समस्यां प्रचंड भेडसावत असत. शहरालगत भाग असल्याने याठिकाणी मोठय़ा प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या. शाहूनगरवासियांच्या समविचारी प्रयत्नातुन काही प्रमाणात आपापल्या सोसायटय़ांमधील प्रश्न सोडवण्यात येत होते. तसेच या भागाला म. जी. प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. तथापि दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढत असलेली लोकसंख्या आणि होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत होता.
दरम्यानच्या काळात शाहूनगरचा संपूर्ण परिसर नगरपरिषदेच्या अखत्यारित आल्याने, याठिकाणचे सर्वांत महत्वाचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत प्राधान्य देणे गरजेचे समजून, सातारा नगरपरिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त माध्यमातुन नगरोथ्थान योजनेमधुन याभागाकरीता मुबलक पुरेल अशी पाणी पुरवठा योजना तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा नगरपरिषदेच्या सहकार्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सातारा कार्यालयाच्या जलव्यवस्थापन उपविभागाने सुमारे 28 कोटी रुपयांची शाहूनगर (शहरी) नळ पाणीपुरवठा (नगरोथ्थान) योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन, राज्यशासनाकडे सादर केला आहे.
यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा म्हणून, सुमारे 7 कोटीपेक्षा जास्त निधी सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच राज्य शासनाने 75 टक्के म्हणजेच 21 कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे. सदरची योजना नगरोथ्थान योजनेमध्ये साकारण्यात येणार असल्याने, निधीची कमतरता भासणार नाही आणि योजनेला अंतिम मंजुरी देखिल लवकरात लवकर मिळून, पूर्णत्वास जाईल असा आमचा विश्वास आहे.
शाहूनगर व परिसरातील नागरिकांनी आजपर्यंत पाण्यासाठी बऱयापैकी हाल सोसले आहेत. त्यामुळेच सन 2054 सालची लोकसंख्या विचारात घेतलेली असल्याने, येथुन पुढे किमान 30-35 वर्षे शाहूनगर आणि परिसराला पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली आहे. या योजनेचा कृष्णा नदी उद्भव निश्चित करण्यात आलेला आहे. तेथुन एमजेपीच्या जलशुध्दीकरण केंद्रामध्ये पाणी आणण्यात येणार आहे. सदरचे पाणी सध्या अस्तित्वातील टाक्यांमधुन (दोन टाक्या- 11 लक्ष आणि 7 लक्ष लिटर्सच्या) आणि नव्याने उभारण्यात येणारी 5.30 लक्ष लिटर्स क्षमतेच्या उंच टाकी आणि नव्यात बांधण्यात येणाऱया 10.40 लक्ष लिटर्सच्या बैठय़ा टाक्यांमध्ये आणले जाणार आहे. त्यानंतर अस्तित्वातील वितरण नलिका आणि नव्या वितरण नलिकेव्दारे शाहूनगर आणि परिसरात पोहोचवले जाणार आहे. प्रस्तावित वितरण व्यवस्थेची एकूण लांबी सुमारे 41 किलोमिटर इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे. आत्ताच्या क्षमतेपेक्षा जवळजवळ दुप्पट म्हणजेच सुमारे 16 लक्ष लिटर्सचा जादा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नवीन योजना साकारल्यावर शाहूनगर, विलासपूर, गोळीबार मैदान, पिरवाडी, इ. परिसरासाठी एकूण 33 लक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होईल असे नियोजन आहे.
अतिशय नियोजनपूर्वक आणि सर्व शक्यतांची पडताळणी, चाचपणी करुन आणि शाहूनगर परिसरातील भौगोलिक परिस्थिती विचारात घेवून ही नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित केलेली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात शाहूनगरवासियांना दररोज दरडोई किमान 135 लिटर्स इतके मुबलक पाणी पुरवले जाणार आहे. त्यासाठी आम्ही स्वतः लक्ष केंद्रीत केले आहे, असेही उदयनराजे यांनी प्रसिध्दीपत्रकात शेवटी नमुद केले आहे.