प्रतिनिधी / सातारा :
शाहूपुरी भागातील नागरिकांना गेले अनेक दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तांत्रिक कारणांमुळे होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांचे ऐन पावसाळ्यात अत्यंत हाल होत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून आपल्या नगरपालिका प्रशासनाद्वारे शाहूपुरीवासियांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे नेते भारत भोसले यांनी केली आहे.
याबाबत सातारा पालिकेचे मुख्याधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात भोसले यांनी म्हटले आहे की, शाहूपुरी भागातील नागरिकांना गेले काही दिवस तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा होऊ शकला नाही. पाणी पुरवठा एक ते दोन दिवस न होणे समजू शकतो. परंतु, सलगपणे पाच-सहा दिवस पाणी पुरवठा होऊ शकणार नसल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे. ही बाब नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीची आहे. या भागात ग्रामीण भागाप्रमाणे अन्य पाण्याचे स्त्राsत उपलब्ध नाहीत. तसेच, संततधार पावसामुळे तर नागरिकांना बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत.
तांत्रिक दुरुस्तीसाठी एवढा वेळ लागत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. आपत्ती काळात आपल्या यंत्रणा या सक्षम असल्याच पाहिजेत अन्यथा त्या तशा नसतील तर हे अत्यंत बेजबाबदारपणाचे लक्षण आहे असे समजावे लागेल. पाणी नसल्याने शाहूपुरीतील जनतेच्या तीव्र भावना आहेत. त्याचे भयंकर पडसाद उमटण्या आधी पाणी पुरवठा पाईपची गळती ही लवकरात लवकर काढून नागरिकांना त्वरीत पाणी पुरवठा कसा होईल हे पाहावे अन्यथा या लॉकडाऊनच्या काळातही नागरिकांना आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भोसले यांच्यासह शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या सदस्यांनी दिला आहे.