राकेश टिकैत यांचा इशारा -कृषी कायद्यांविरोधात विविध मागण्यांसाठी शेतकऱयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही
मुझफ्फरनगर / वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ रविवारी संयुक्त किसान मोर्चाने उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये किसान महापंचायत आयोजित केली. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी येथे तडाखेबंद भाषण करत सरकारने संपूर्ण देश विकल्याचा आरोप केला. आता लढा ‘मिशन यूपी’ आणि ‘मिशन उत्तराखंड’ असा उरलेला नसून देश वाचवण्यासाठी शेतकऱयांच्या नेतृत्त्वाखालीच आंदोलन तीव्र करावे लागेल असे टिकैत यांनी म्हटले आहे.
देशात कृषी कायद्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही. अनेक शेतकरी अजूनही आंदोलन करत आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून कृषी कायदे तसेच शेतकऱयांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. टिकैत यांच्या या घोषणेनंतर आता केंद्र सरकारच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱयांच्या पाठीशी आहे. शेतकऱयांच्या हक्कांच्या लढाईसाठी आम्ही नेहमीच शेतकऱयांच्या पाठीशी आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अल्लाह हू अकबर आणि हर हर महादेव चे नारे नेहमीच उठवले गेले आहेत आणि वापरले जात राहतील. आम्ही येथे दंगली होऊ देणार नाही. हा देश आमचा आहे, हे राज्य आमचे आहे, हा जिल्हा आमचा आहे, असे महापंचायतीमध्ये राकेश टिकैत म्हणाले. तसेच शेतकऱयांनी मागील वर्षीपासून सुरू केलेले आंदोलन भविष्यातही सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.
सरकारकडून शेतकऱयांसोबत सर्वांची फसवणूक
देशातील सरकारने शेतकऱयांसह सर्वांची फसवणूक केली आहे. रेल्वे, वीज, महत्त्वाची प्रति÷ापने, रस्ते, एफसीआय गोदामे, बंदरे खाजगी कंपन्यांना विकली गेली आहेत. आता शेतीही या कंपन्या विकण्याच्या तयारीत आहे. एक प्रकारे संपूर्ण भारत विक्रीसाठी काढण्यात आला आहे, असेही राकेश टिकैत म्हणाले. साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱयांचे 12,000 कोटी रुपये थकीत आहेत. गेल्या दोन सरकारांनी उसाचे दर वाढवले आहेत, पण योगी सरकारने एक पैसाही वाढवला नाही. जेव्हा आपण शेतकऱयांच्या हिताबद्दल बोलतो तेव्हा सरकार त्याला ‘राजकारण’ म्हणते, असा टोलाही त्यांनी मारला.
जानेवारीपासून सरकारचा आमच्याशी संवाद बंद
नवीन कृषी कायद्यांना आमचा विरोध कायम असून मागील नऊ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसलेले आहेत. या वर्षाच्या जानेवारीपासून सरकारने आमच्याशी संवाद साधणे बंद केलेले आहे. देशाची संपत्ती विकणाऱयांना आपण ओळखले पाहिजे असे सांगत कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन यापुढेही सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिकाला भाव नाही, तर मत नाही
शेतकरी मोर्चाने आयोजित केलेल्या आजच्या महापंच्यातीला हजारो शेतकऱयांनी उपस्थिती लावली. मुजफ्फरनगर येथील मैदान आज खचाखच भरलेले होते. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी शेतकऱयांच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर निवडणुकीत मतदानही मिळणार नाही, असे सांगितले. ‘ही लढाई ही कृषी कायदे आणि किमान आधारभूत किंमत यासाठी आहे. शेतकऱयांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकरी मतदान करणार नाहीत. आता मतदानाच्या माध्यमातून आपल्याला घाव घालावा लागेल,’ असे टिकैत यांनी सांगितले.
…तर त्यांना फोडून काढण्याचा इशारा
महापंचायतीला मोठय़ा संख्येने लोक उपस्थित राहतील, असा विश्वास भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. महापंचायतीसाठी किती लोक येतील, हे सांगणे शक्मय नाही. महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून शेतकऱयांना कोणीही रोखू शकत नाही. जर आम्हाला थांबवण्याचा कोणीही प्रयत्न केला, तर त्यांना फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू, असा इशारा टिकैत यांनी रविवारी सकाळी महापंचायत सुरू होण्यापूर्वी दिला होता.