प्रतिनिधी/ सातारा
एक जानेवारीला दरवर्षी देशभरातील लाखो अनुयायी भीमा कोरेगाव येथे एकत्र येऊन शौर्यदिनाचा जल्लोष करतात आणि विजयस्तंभाला अभिवादन करतात. या अभिवादन सोहळ्यात समता सैनिक दलाच्या मानवंदनेला विशेष महत्व असते. यावर्षी समता सैनिक दलाने सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सैनिकी इतमामात मानवंदना दिली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शौर्यदिन यांच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला.
1 जानेवारी 1818 चा रणसंग्राम जगभर चर्चेत राहिलेला आहे. या रणसंग्रामाच्या स्मरण करून शूरवीरांना अभिवादन करणाऱयासाठी साताऱयात मानवंदनेचे आयोजन करण्यात आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या हस्ते पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मेजर जयसिंगराव सोरटे, लेप्टनंट देवेंद्र सपकाळ, सुभेदार मोहन यादव, सुभेदार विश्वनाथ गायकवाड, कमांडर उत्तम कांबळे, कमांडर संयोजना बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पूष्पचक्र अर्पण करण्यात आले.
यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ, वंचितचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत, बसपाचे जिल्हाप्रमुख दादासाहेब गायकवाड, अमर गायकवाड, समाजवादी रिपब्लिकनचे पी. डी. साबळे, रिपब्लिकन गवई गटाचे चंद्रकांत कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
भीमा कोरेगावचा इतिहास जाज्वल्य आहे. तो अन्यायाविरुध्दचा प्रखर आक्रोश आहे. जेव्हा जेव्हा इथल्या व्यवस्थेने सर्वसामान्य, गोरगरीब माणसावर अन्याय केला, छत्रपती शिवरायांना विरोध केला तेव्हा तेव्हा महार समाज हा पेटून उठला आहे. यापूढील काळात छत्रपती शिवरायांचा आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारातील लोकशाही अंमलात आणावयाची असेल तर आपण जागृत राहायला हवे, असे आवाहनही रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केले. चंद्रकांत खंडाईत यांनी संविधानाला अनुसरुन यापुढील लढाई कशी लढता येईल यासाठीचा प्रयत्न करायला हवा, असे स्पष्ट केले. अमर गायकवाड आदींची यावेळी मनोगते झाली.
प्रारंभी त्रिसरण पंचशील घेण्यात आले. मान्यवरांच्या मनोगतानंतर शाहीर श्रीरंग रणदिवे, शाहीर वैभव गायकवाड, शाहीर भोसले यांनी क्रांतिगीते सादर केली तर समता सैनिक दलाच्या शौर्यगीताने मानवंदनेचा शेवट झाला. अरुण पोळ यांनी प्रास्तविक केले. साहित्यिक अरुण जावळे यांनी आभार मानले.