विठ्ठल गुरव महाराज यांचे विचार : कोगनोळी येथे कीर्तन कार्यक्रम
वार्ताहर/ कोगनोळी
जीवांचा उद्धार करण्यासाठी संत अवतिर्ण होतात. संतांच्या वाणीमध्ये शुद्धता, पवित्रता असते. संत महिमा समजण्यासाठी भावशक्ती पाहिजे, असे विचार मळगे (ता. कागल) येथील विठ्ठल गुरव महाराज यांनी व्यक्त केले. येथील वैष्णव मंदिरात सोपानकाका महाराज देहूकर यांच्या पुण्यतिथी सोहळय़ानिमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते.
धन्य ते संसारी ! दयावंत जे अंतरी !!
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरुपण करताना गुरव महाराज पुढे म्हणाले, संतचरित्र कळले पाहिजे, संतांचा महिमा आणि संतांची लक्षणे या तीन गोष्टी प्राप्त होणे आवश्यक आहे. महात्मा गांधी, विनोबा भावे, लोकमान्य टिळक आदी थोर पुरुषांनीही संत चरित्राचे वाचन केले. साधूसंतांचे दर्शन होण्यासाठी देवाने आपल्यावर कृपा केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कुलदीप खोत-कोगील यांनी मृदंग साथ, सुरदास गायकवाड महाराज-कोगनोळी व साताप्पा देवडकर-म्हाकवे यांनी गायन साथ दिली.
याप्रसंगी अरुण नलवडे, सागर हवालदार, हिंदुराव नागराळे, भीमराव जगदाळे, के. डी. पाटील, उदय जाधव, बबन संकेश्वरे, संजय पाटील, भरतेश शिंदे, संजय परीट, बाबासो वडर, प्रशांत पाटील यांच्यासह यमगे, मळगे, गिरगाव, लिंगनूर, सुळगाव, शंकरवाडी, म्हाकवे, अलाटवाडी, कागल, हंचिनाळ व कोगनोळी येथील भाविक, वारकरी उपस्थित होते. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.