प्रतिनिधी / कोल्हापूर:
सरसेनापती संताजी घोरपडे कधीच मोगलांना जाऊन सामील झाले नाहीत. ते शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. अशा या महान योद्ध्याचे सेनापती कापशी येथे होत असलेले स्मारक गौरवास्पद आहे, अशी भावना ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने सेनापती कापशी ता. कागल येथे सुरु असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकांच्या कामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी डॉ. पवार यांची कोल्हापुरातील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
डॉ. पवार म्हणाले, औरंगजेबाचे चरित्रकार खाफीखान व साकीम उस्तेद खान यांनीही संताजीच्या शौर्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. एवढी त्यांची महानता होती. मंत्री मुश्रीफ म्हणाले, या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात पावणेदोन कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. परंतु गेल्या पाच वर्षात स्मारकाचे काम निधीअभावी रखडले. आत्ता पावणेसात कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यावेळी स्मारकासह परिसरातील सभागृह, ग्रंथालय, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या अश्वारूढ पुतळÎासह चबुतरा या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी वसुधा पवार यांनी स्वर्गीय दिनकरराव शिंदे यांनी स्थापन केलेले गडहिंग्लज येथील शिवाजी बोर्डिंग पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कागलचे उप अभियंता डी. व्ही. शिंदे, सुनील चौगुले आदी उपस्थित होते