वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱया टप्प्यात कृषी कायदे आणि महागाईवर चर्चा करविण्यावरून विरोधकांचा गोंधळ सलग तिसऱया दिवशीही सुरूच राहिला आहे. गोंधळामुळे राज्यसभेतील प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही आणि कामकाज स्थगित करावे लागले. तर लोकसभेत विरोधकांच्या गोंधळादरम्यान प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला असला तरीही अधिक वेळ चालू शकला नाही.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी खासदारांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. गोंधळादरम्यान सभागृहाचे कामकाज दुपारी 12.30 वाजता पुन्हा सुरू झाले. याचदरम्यान सरकारने दिल्लीतील अनियमित वस्त्यांना नियमित करणारे विधेयक संमन करवून घेतले आहे. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 12 मार्चपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात यावर भूमिका मांडू इच्छितात, पण त्यापूर्वी सभागृह शांततेने चालविणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस वगळून उर्वरित सर्व पक्ष यावर सहमत असल्याचे उद्गार संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काढले आहेत.
लोकसभेतील अडथळा दूर करण्यासाठी अध्यक्ष बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविली. त्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना स्वतःच्या दालनात पाचारण केले आहे. सभागृहाच्या समितीच्या निर्णयानुसार शुक्रवारी सभागृहाचे निर्धारित कामकाज रद्द होणार असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली आहे.