प्रतिनिधी / मडगाव
शेळ – मेळावलीतील लोकांनी आपल्या शेतीयोग्य जमिनीचे रक्षण करण्यासाठी भाजप सरकारने लादलेल्या आयआयटी प्रकल्पास विरोध करणाऱया ग्रामस्थांवर पोलिसांकडुन लाठीमार व अश्रुधूराचा वापर करणारी भाजप सरकारच्या धक्कादायक कृतीचा तीव्र निषेध करत असल्याचे दिगंबर कामत यांनी सांगीतले. सरकारने पोलिसांची दादागीरी चालुच ठेवल्यास संपुर्ण गोवा शेळ-मेळावलीत जमणार असल्याचा इशारा विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी दिला.
शेळ मेळावलीतील आयआयटीला विरोध करण्यासाठी प्रामाणिकपणाने लढणाऱया वृद्ध महिलांवर पोलीसांनी केलेला लाठीमार दुर्देवी आहे. सरकार कोणताही प्रकल्प जनतेच्या इच्छे विरुद्ध लादु शकत नाही. शेळ मेळावलीतील रहिवासी आपली शेतीयोग्य जमिनीचे व घरांचे रक्षण करण्यासाठी लढा देत आहेत. सरकारकडे आज आयआयटीसाठी इतर पडिक जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सरकारने आयआयटी प्रकल्प तिथे हलविणे गरजेचे आहे. लोक भावनांचा आदर करणे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे असे दिगंबर कामत म्हणाले.
काँग्रेस सरकारच्या काळात अनेक आंदोलने झाली व लोकांच्या मागणीला मान देऊन आम्ही प्रादेशीक आराखडा रद्द केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हुकूमशाही वृत्ती सोडुन जनतेचे म्हणणे ऐकणे गरजेचे आहे. सरकारने ताबडतोब पोलिस बळाचा वापर करणे थांबवावे व शहाणपणा दाखवुन आपला निर्णय बदलावा. अन्यथा संपुर्ण गोवा पेटून उठेल व लोकांना आवरणे सरकारला कठिण होणार हे मुख्यमंत्र्यानी ध्यानात ठेवावे असे दिगंबर कामत यांनी सांगीतले.