विद्यागम अंतर्गत शैक्षणिक वाटचाल सुरूच राहणार
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना लॉकडाऊनमुळे शैक्षणिक क्षेत्र पुरते ढवळून निघाले. शाळास्तरावर ऑनलाईन शिक्षण दिले जात असले तरी नियोजित वेळापत्रकानुसार शाळांचे पहिले सत्र संपत आले आहे. मात्र, पहिल्या सत्राची समाप्ती म्हणजे सहामाही परीक्षांबाबत शाळास्तरावर संभ्रमाची स्थिती आहे. शिक्षण विभागाकडून परीक्षेबाबत अजून कोणतीच मार्गदर्शक प्रणाली जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्वांमध्ये परीक्षेबाबत संभ्रमाची स्थिती आहे. दसरा सुटी रद्द करण्यात आली असून विद्यागम अंतर्गत शैक्षणिक वाटचाल सुरूच राहणार आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्षाचे नियोजन ढोबळमानाने वर्षाच्या सुरुवातीलाच आखले जाते. पण यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यालाच मोठी खीळ बसली आणि शैक्षणिक वाटचालीचा गाडा पुरता कोलमडून गेला. परिस्थितीमुळे अजूनही शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे धोरण स्पष्ट झालेले नाही. यामुळे प्रथम वर्षात घेण्यात येणाऱया सहामाही परीक्षेविषयी अस्पष्टताच आहे. अर्थात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांकडून आपल्या पातळीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, शिक्षण विभागाकडून एफ ए 1 तसेच एफ ए 2 (चाचणी परीक्षा) या परीक्षांबरोबरच आणि सहामाही परीक्षेबाबतचा कोणताच आदेश नसल्याने परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यागम अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी ऑनलाईन, प्रत्यक्ष भेटी तसेच फोनद्वारे संपर्क करून विद्यार्थ्यांकडून शिक्षणाचे धडे गिरवून घेतले जात आहेत. सदर प्रणालीत विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनलॉकच्या टप्प्यानुसार परिस्थितीनुरुप शाळा सुरू होण्याबाबतचे विविध आदेश जाहीर केले जात आहेत. मात्र पहिले सत्र संपण्यास आले तरीदेखील परीक्षेबाबत स्पष्टता नाही. त्यातच पालकांची परीक्षेबाबत विचारपूस, अभ्यासक्रमपूर्तीचे संकट, परीक्षेच्या नियोजनाचा अभाव यामुळे सहामाही परीक्षेबाबतचा पेच उभा आहे.
परीक्षा फिव्हर घरातच
शाळास्तरावर दसऱयाच्या सुटीपूर्वी परीक्षा फिव्हर अनुभवायला मिळतो. उजळणी, सराव यांच्या माध्यमातून परीक्षेची तयारी केली जाते. वेळापत्रकानुसार परीक्षा असल्याने परीक्षेचे चित्र स्पष्टच होते. मात्र, सरकारी आदेशानुसार परीक्षेबाबत अस्पष्टताच आहे. सध्या खासगी व्यवस्थापनाच्या शाळांकडून आपल्या स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांमुळे घराघरात परीक्षा फिव्हर दिसून येत आहे. शिक्षकांनी सांगितलेल्या नियोजनानुसार पालकांकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. पेपरची नमुना प्रत देणे, पेपर सोडवून घेणे आणि परीक्षकांची भूमिका बजावत पेपर शिक्षकांकडे पोहचविण्याची भूमिका पालकांना बजावावी लागत आहे. यामुळे घरातच परीक्षा फिव्हर अनुभवायला मिळत आहे.