प्रतिनिधी / सातारा :
सातारा पालिकेला स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे वावडे आहे. स्वच्छ भारत स्पर्धेतील घसरलेल्या निकालवरुन दिसून येत आहे. प्रभाग 5 मध्ये गोडोलीतील भैरवनाथ मंदिराच्या समोरील शौचालय पडण्याच्या स्थितीत आहे. अनेक वेळा अर्ज-विनंत्या करुनही कसलीही कार्यवाही होत नाही. भौतिक विकासापासून वंचित ठेवण्याचे कुटील कारस्थान असून शौचालयाचे काम न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा नगरसेवक शेखर मोरे पाटील यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा पालिकेमध्ये नेहमीच दुजाभावाचे कुटील राजकारण प्रभाग 5 करीता घडत आहे. विकासपासून वंचित ठेवण्याचा नेहमीच डाव होत आहे. एक वर्षापूर्वी म्हणजेच दि.11 सप्टेंबर 2019 रोजी शहरातील 7 शौचालयाच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये गोडोली येथील भैरोबा मंदिराच्या शेजारील शौचालय बांधकाम करण्याचेही काम होते. या कामाकरता 32 लाख 47 हजार 457 रुपयांच्या या कामाची निविदा दि. 16 सप्टेंबर 2019 ला डाऊनलोड केली तर दि.25 सप्टेंबर 2019 रोजी उघडली होती. त्यावेळी निविदा प्रक्रियेतल्या इतर शौचालयांची कामे झाली परंतु वैयक्तिक आकसापोटी प्रभाग 5 मधील हे काम तसेच ठेवण्यात आले. त्या शौचालयासाठी दि. 27 फेब्रुवार 2018 ला अर्ज दिला होता. या दरम्यान, आपली नगरपालिका स्वच्छता सर्व्हेक्षणअंतर्गत ओडीएफ योजनेत सहभागी झाले होते. ओडीएफमध्ये समावेश होण्याकरता शासनाच्या निकषानुसार शहरातील सर्व ठिकाणी सोयीनियुक्त 16 जागी बांधकाम करणे गरजेचे आहे, असा अहवाल आरोग्य विभागामार्फत निश्चित करण्यात आला होता. या अहवालानुसार गोडोली भैरवनाथ मंदिरासमोरील शौचालयाची दुरावस्था पहाता त्या ठिकाणचे शौचालय पाडून नवीन शौचालय बांधण्यासाठी बांधकाम विभागास आदेश देण्यात यावेत, अशी टीप्पणी आरोग्य विभागाने सादर केली होती. परंतु नगरपालिका मुळातच स्वच्छ भारत अभियानाबाबत उदासिन असल्याचे दिसून येते. भैरवनाथ मंदिरासमोरील शौचालय हे पडण्याच्या स्थितीत असून् तेथे राहणारे नागरिक जीव धोक्यात घालून वापर करतात. पालिकेस वारंवार निवेदने देवूनही नवीन शौचालय बांधून नागरिकांची गैरसोय दुर करावी, होणारी दुर्घटना टाळण्यात यावी, अन्यथा भौतिक विकासापासून वंचित ठेवण्यात आल्याबद्दल पालिकेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.