पोलीस निरीक्षक निंबाळकर यांच्या हलचाली सुरू
प्रतिनिधी/ सातारा
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 24 तास ऑनडय़ूटी असलेल्या डीबी पथकाला सातारा शहरातील गुह्यांची उकल करण्यास अपयश आले. यामुळे वरिष्ठांनी हे डीबी पथक बरखास्त केले. आता हे डीबी पथक पुन्हा स्थापन करण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पथक स्थापन करण्यात स्वतः लक्ष घातले आहे. या पथकांच्या प्रमुख पदाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक एस व्ही कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
डीबी स्कॉडला पोलीस दलात विशेष महत्त्व होते. सर्वसामान्य नागरिकांच्यात मिसळून पोलीस दलाची प्रतिमा उंचावणे, गोपनीय माहिती मिळविणे, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी डीबी स्कॉड सहाय्यभूत ठरते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक गेल्या अनेक वर्षापूर्वीच स्थापन करण्यात आले होते. या पथकांचे प्रमुख नानासाहेब कदम यांनी गुन्हेगारांच्या चांगल्या मुसक्या आवळल्या होत्या. परंतु त्यांची बदली शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली. ही जबाबदारी पोलीस निरीक्षक मच्छले यांच्यावर आली. डीबी प्रमुख पदात झालेल्या फेरबदलाचा फटका पथकाला बसला आणि कारवाया थंडावल्या. यातच सुरूची राडा प्रकरणाची पुनारावृत्ती शहरात झाली. सनी भोसले-बाळु खंदारे यांच्यात गाडय़ा पार्किगवरून वादावादी झाली. सनी भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवत बाळु खंदारे फरार झाला. त्याला फरार होवून दीड महिना झाला आहे. त्याचे इतर साथीदाराना अटक करण्यात पोलीसांना यश आले. परंतु त्याना जमीन मिळाला आहे. बाळु खंदारे हा मोक्क्यातील आरोपी असून तो अद्याप फरार आहे. यामुळे खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत डीबी पथकांवर व शहर पोलीसांच्या तपासावर ताशेरे ओढले. यामुळे हे पथक वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी बरखास्त केले आहे. आता नव्याने पथक स्थापन करण्याच्या हलचाली सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे वैयक्तिक लक्ष घालून हे पथक स्थापन करणार आहेत. यामुळे पथक स्थापनेनंतर बाळु खंदारे लवकरच पोलीसांच्या ताब्यात येणार असल्याचा विश्वास नागरिकांच्या मनात पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी निर्माण केला आहे.