प्रतिनिधी / सातारा :
गेल्या दोन दिवसापासून साताऱ्याच्या तापमानात बदल झाला आहे. थंडी गायब होऊन पारा 39 अंशावर पोहचला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिक दुपारी 12 नंतर घराबाहेर न पडता घरातच वेळ घालवत आहेत.
एकीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. तर तापमान वाढीने नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमान तर सतत 35 अंशावर होते. मार्च महिन्यातच कमाल तापमानही 35 अंशावर पोहोचले होते. आता एप्रिल महिना सुरू झाल्यापासूनही कमाल तापमान 38 अंशापर्यंत आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ऊन वाढले आहे. शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करत आहे. सातारा शहरातही उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. सातारकर उकाड्याने हैराण झाले आहेत. पुढील दीड महिना तरी उन्हाची तीव्रता राहणार आहे.
जिल्ह्याच्या किमान तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. कधी 17 अंशापर्यंत खाली येते. तर काहीवेळा पारा 20 अंशापर्यंत जात आहे. मात्र कमाल तापमान 37 अंशावर कायम आहे. तरीही काहीवेळा ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे कमाल तापमान वाढत असले तरी उतारही येत आहे. मात्र येत्या काही दिवसांत कमाल तापमान 40 अंशापर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.