ऑनलाईन टीम / पुणे :
अंगणवाडी, बालवाडी, व्यायामशाळा, पतपेढ्या यांचे जाळे पुण्यात वाढले आहे. माणसाला सगळी नाटके करता येते. परंतु पैशांचे सोंग घेता येत नाही. सामान्य माणसांच्या छोट्या गरजा भागविण्याचे काम पतसंस्था करतात. मोठ्या बँका नाही तर पतसंस्थाच तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आर्थिक सहाय्य करतात, त्यामुळे सामाजिक भान जपणाऱ्या पतसंस्था आहेत, असे मत खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
समाजात उल्लेखनीय कार्य करणा-या जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अभय माटे, डॉ.दिलीप देवधर यांना यंदाचा श्री यशोधन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. सदाशिव पेठेतील श्री यशोधन नागरी सहकारी पतसंस्था आणि चौफेर प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश करपे, यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा आशा क्षीरसागर, चौफेर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पासलकर, पतसंस्थेचे सचिव राहुल भाटे उपस्थित होते. माऊली वृद्धाश्रमाला यावेळी 25 हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच अयोद्धया राम मंदिर न्यासाला 1 लाख 51 हजारांचा धनादेश देण्यात आला.
अभय माटे म्हणाले, सेवाकार्य करण्याची समाजात गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील संस्काराशी प्रेरीत होऊन कार्य करणारे अनेक जण आहेत. परंतु त्यामध्ये आणखी वाढ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.