दोन सत्रांमध्ये परीक्षा, सुसूत्र अभ्यासक्रम ही वैशिष्टय़े
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शैक्षणिक वर्ष 2022 करिता नवे अभ्यासक्रम धोरण घोषित केले आहे. त्यात विशेष मूल्यांकन पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. 2021-2022 या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावी परीक्षा दोन सत्रांमध्ये विभागण्यात येणार आहेत. ही पद्धती कोरोना उद्रेक संपल्यानंतरही चालू ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पहिल्या सत्रातील परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये होणार असून या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येतील. तर दुसऱया सत्रातील परीक्षा सब्जेक्टिव्ह पद्धतीची असून ती मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येईल. या दोन्ही परिक्षांचा अभ्यासक्रम एकमेकांना छेद देणारा (ओव्हरलॅपिंग) नसेल. तसेच विद्यार्थ्याचा अंतिम परिणाम या दोन्ही परीक्षांमधील त्याच्या कामगिरीवर आधारित राहणार असून दोन्ही परीक्षांना समान महत्व (वेटेज) देण्यात येणार आहे.
लवचिक धोरण अवलंबणार
पहिल्या सहामाहीच्या अखेरीस पहिल्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल. तिचे वेळापत्रक लवचिक असेल. ते देशाच्या विविध भागांमधील वातावरण लक्षात घेऊन तयार पेले जाईल आणि परीक्षेचा कालावधी 4 ते 8 आठवडे असेल. परीक्षेतील प्रश्न बहुपर्यायी उत्तर पद्धतीचे असतील आणि प्रत्येक प्रश्नप्रत्रिका 90 मिनिटांची असेल. या परीक्षेचा अभ्यासक्रम (सिलॅबस) सुसूत्रीकृत (रॅशनलाईझ्ड) असेल.
दुसऱया सत्रातील परीक्षा दुसरी सहामाही संपल्यानंतर घेण्यात येईल. या परीक्षेचा अभ्यासक्रमही सुसूत्रीकृत असेल. या परीक्षेत सविस्तर उत्तरांचे (सब्जेक्टिव्ह प्रकारचे) प्रश्न विचारण्यात येतील. मात्र, तोपर्यंत कोरोना परिस्थिती सुधारलेली नसेल तर दुसऱया सत्रातील परीक्षाही पहिल्या सत्राप्रमाणे बहुपर्यायी उत्तरांचीच असेल असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना उत्तरे ओएमआर कागदांवर लिहायची असून नंतर त्यांचे स्कॅनिंग करण्यात करून ते सीबीएसई पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. त्यांची तपासणी करून गुण त्याच दिवशी शाळांकडून अपलोड करण्यात येतील. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना कमी करण्यात आलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमाचाच अभ्यास करावा लागेल. तसेच पहिल्या सत्रातील परीक्षेत ज्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जातील, त्या अभ्यासक्रमावर दुसऱया सत्रातील परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत. तसेच दुसऱया सत्रातील अभ्यासक्रमावर पहिल्या सत्रातील परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
बॉक्स
ऑनलाईन परीक्षेचा पर्याय
परिस्थिती पाहून ऑन लाईन परीक्षेचा पर्यायही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्याचा मंडळाचा विचार आहे. कोरोनामुळे अनेकदा परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत किंवा रद्द केल्या जात आहेत. परिणामी, ऑन लाईन परीक्षेसंबंधी मंडळ गंभीरपणे विचार करीत आहे. तशी यंत्रणा निर्माण केली जात आहे, असे सांगण्यात आले. कोरोना परिस्थिती सुधारल्यास आणि विद्यार्थ्यांना शाळेत येऊन परीक्षा देणे शक्य झाल्यास शाळांमध्ये परीक्षा घेतल्या जातील. तसेच थिअरीचे गुण दोन्ही परीक्षांमध्ये समानरित्या विभागले जातील. मात्र, कोरोना परिस्थिती न सुधारल्यास विद्यार्थ्यांना घरातून ऑनलाईन किंवा ऑफ लाईन परीक्षा देता येईल. पहिल्या सत्रातील परीक्षा घरातून दिली गेल्यास तिचे महत्व कमी धरण्यात येईल. दुसऱया सत्रातील परीक्षा शाळेत येऊन दिली गेल्यास तिचे महत्व (वेटेज) अधिक धरण्यात येईल. याच्या उलट परिस्थिती असल्यास तोच नियम लावण्यात येणार आहे.