प्रतिनिधी/ उंब्रज/आनेवाडी
संपूर्ण भारत देशात वाहनांसाठी फास्टटॅग लागू केल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून फास्टटॅग नसणाऱया वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसुली करण्यात येवू लागल्याने पुणे-बंगलोर महामार्गावरील आनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर वाहनधारक आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱयांमध्ये वादावादीचे प्रकार वाढल्याने टोलनाक्यावर वाहनांच्या मोठ मोठय़ा रांगा लागलेल्या आहेत.
दुप्पट टोल वसुली बरोबर दुप्पट वाहन कोंडी ह्या सर्व अजब-गजब गोष्टी समोर आल्याने याचा इतर वाहनचालकांना देखील याचा त्रास भोगावा लागला आहे. अशी कोणतीच गाडी जात नव्हती की जे वाद-विवाद घालत नाही असा प्रकार मंगळवार सकाळपासून आनेवाडी टोल (ता. सातारा) नाक्यावर सुरु झाला आहे.
दरम्यान, टोलनाक्यांवरुन जाणाऱया सर्व गाडय़ांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टॅग नसल्यास दुप्पट दराने टोल आकारणी होत आहे. त्यामुळे वाहनधारकांची भलतीच पंचायत निर्माण झाल्याचे चित्र मंगळवारी दिवसभर तासवडे टोलनाक्यावर होते. फास्टॅग बसविण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही फास्टॅग न बसविणाऱया वाहनधारकांकडून टोलनाक्यावर दुप्पट टोल वसुली करण्याबाबतच्या शासन निर्णयाची तासवडे (ता.कराड) येथील टोल नाक्यावर वसुली यंत्रणेने कडक अंमलबजावणी सुरु केली आहे.
त्यानुसार फास्टॅग नसणाऱया अनेक वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागला. मंगळवारी सकाळपासून आनेवाडी व तासवडे येथील टोलनाक्यावर दोन्हीं बाजूला फास्टॅग नसणाया वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान रविवारपासून वाहनधारकांची तासवडे टोलनाक्यावर वाहनांना फास्टॅग बसविण्यासाठी गर्दी सुरू आहे. दरम्यान फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांना यापुढे कोणत्याही लेनमधून प्रवास करताना दुप्पट टोलचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच वाहनधारकांनी कोणत्याही परिस्थितीत टोलनाक्यावरील आपला वेळ व इंधन वाचविण्यासाठी आपल्या वाहनांना फास्टॅग बसवून घ्यावे, असे आवाहन तासवडे टोलचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी केले आहे.
स्थानिकांनी आपल्या वाहनांना फास्टॅग बसविला असल्याने टोलनाक्यावरुन प्रवास करताना अनेक वाहनधारकांना टोल रक्कमेत पूर्वीपासून सवलत असतानाही आता फास्टॅग यंत्रणेच्या रक्कमेचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच स्थानिकांना टोलनाक्यावर स्वतंत्र लेन नसल्याने तासनतास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे, त्यामुळे येथे वादाचे खटके उडत आहेत. परिणामी, त्यामुळे स्थानिकांत नाराजीचा सूर असून फास्टॅगमध्ये सवलत देऊन स्थानिकांना बसणारा भुर्दंड थांबवावा तसेच स्थानिकांसाठी स्वतंत्र लेन व्यवस्था करुन स्थानिकांना होणारा नाहक त्रास थांबवावा, अशी मागणी होत आहे.