सातारा / प्रतिनिधी
कोरोनामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर सर्वसामान्यांची लालपरी पुन्हा एकदा जिह्यातील ग्रामीण भागात पोचणार आहे. तालुक्यांच्या ठिकाणांवरून महत्त्वाच्या तसेच उत्पन्नच्या मार्गावरील गावांमध्ये बससेवा सुरू करण्याबाबत परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्यावतीने नियोजन सुरू आहे. सोमवार दि. 15 पासून प्रत्यक्ष याची अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याची माहिती सातारा एसटी परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे.
संपूर्ण देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 23 मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीची चाके जागीच थांबली. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन सर्वसामाऱयांची लालपरी अहोरात्र रस्त्यांवर फिरत होती. आतापर्यंत कधीही एवढय़ा दीर्घकाळ एसटी थांबली नव्हती. मात्र, कोरोना संसर्गाच्या काळात सर्व परिस्थीती बदलली आणि एसटी थांबली.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास एसटीला परवानगी मिळाली. त्यामुळे जिह्यात एसटी बस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांची जिह्यामध्ये 22 मे पासून अंमलबजावणी सुरू झाली. सुरवातीच्या टप्प्यात प्रतिसाद पाहण्यासाठी जिल्हा ते तालुका ठिकाणांपर्यंत जाणाऱया 31 बसगाडय़ांच्या 101 फेऱयांचे नियोजन विभागीय कार्यालयामार्फत करण्यात आले होते.
प्रत्येक बसमधून 20 प्रवासी नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, ग्रामीण भागातून नागरिकांना येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे 22 मे पासून तसा मोठा प्रतिसाद एसटी वाहतुकीला मिळाला नाही. सरासरी 15 ते 16 प्रवासी घेऊनच एसटीला धावावे लागले. त्यामुळे आता ग्रामीण भागातील महत्त्वाच्या भागांना तालुक्याशी जोडणारी एसटी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय विभागीय कार्यालयामार्फत घेण्यात आला आहे.
त्यामध्ये फलटण, लोणंद, वाई, कराड, ढेबेवाडी, मसुर अशा भागांत गाडय़ांच्या फेऱयांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर असलेल्या आगारांना त्यांच्या नफ्यामध्ये असणाऱया मार्गांची माहिती मागविण्यात आली आहे. सोमवारपर्यंत विभागीय कार्यालयातून गाडय़ांच्या मार्गाचे नियोजन केले जाणार आहे.
सध्या 30 गाडय़ांवरून पहिल्या टप्प्यात 50 गाडय़ांपर्यंत संख्या नेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून येणारा प्रतिसाद पाहून 15 दिवसांमध्ये ही संख्या 100 गाडय़ांपर्यंत नेण्याचा विचार महामंडळाकडून सुरू असल्याची माहिती एसटी महामंडाळाकडून देण्यात आली. त्यामुळे सोमवारपासून जिह्यातील ग्रामिण भागातील खेडोपाडय़ातही एसटी धावणार असल्याने सर्वसामान्यांना दळणवळणासाठी दिलासा मिळणार आहे.