अभ्यास करून परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाला सादर करणार : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी घाई करून चालणार नाही. हद्दवाढीसाठी आवश्यक असणार्या सर्व बाबींचा अभ्यास करून राज्य शासनाकडे अत्यंत परिपूर्ण असा प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. प्रस्ताव पाठविण्यासाठी विशिष्ट तारीख ठरली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासक डॉ. बलकवडे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते.
हद्दवाढीचा प्रस्ताव ठराविक तारखेला राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी चर्चा सुरू असल्याबद्दल प्रशासक डॉ. बलकवडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, हद्दवाढ झालीच पाहिजे ही महापालिका प्रशासनाची भूमिका आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनंतर महापालिका प्रशासनाने माहिती संकलन सुरू केले आहे. महापालिकेच्या सभागृहाने हद्दवाढीच्या संदर्भात आजपर्यंत जे ठराव मंजूर केले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाने ते राज्यशासनाकडे पाठविले आहे, त्यांचीही माहिती घेण्यात येत आहे. 2015 मध्ये हद्दवाढीसाठी महापलिका प्रशासनाने शेवटचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविला होता. त्यानंतर गेल्या पाच वर्षात एकही प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे हद्दवाढ करताना आवश्यक असणार्या सर्व बाबी, कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यात येत आहे. कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणही तीन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले आहे. हद्दवाढीचा प्रस्ताव देत असताना प्राधिकरणाची जबाबदारी, कार्य यांचाही अभ्यास केला जाईल. या सर्व बाबीं नमूद करून परिपूर्ण आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम असा प्रस्ताव राज्यशासनाला पाठविण्यात येईल. त्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, असेही प्रशासक डॉ. बलकवडे यांनी स्पष्ट केले.
विरोध करणार्यांनाही मत मांडण्याचा अधिकार
हद्दवाढ विरोधी कृती समितीने मेळाव्यात प्रस्तावित गावांना हद्दवाढीविरोधात ग्रामसभेत ठराव करण्याचे आवाहन केले आहे, या विषयी विचारले प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, संधी आहे. हद्दवाढीचा प्रस्ताव मात्र सर्व प्रशासकीय बाबींचा समावेश करून दिला जाईल.