वृत्त संस्था / मुंबई
संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाबरोबर असलेला अष्टपैलू हार्दिक पांडय़ा कदाचित गोलंदाजी करणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू वेंकटेश अय्यरला राखीव म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे.
अरब अमिरातमध्ये सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यात मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळले. हार्दिकने पाच सामन्यात केवळ 75 धावा जमविल्या त्यामध्ये त्याने एका सामन्यात नाबाद 40 धावा केल्या होत्या. पण मुंबई इंडियन्सने या सामन्यात हार्दिकला एकही षटक गोलंदाजी करण्यासाठी दिले नाही.
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये हार्दिक पंडय़ांचा समावेश करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी हार्दिक पंडय़ाला पाठीची दुखापत झाली होती. त्याने ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया करवून घेतली होती.
हार्दिक पंडय़ा या स्पर्धेसाठी आता पूर्ण तंदुरूस्त आहे. पण, त्याला प्रत्येक सामन्यात गोलंदाजीची संधी दिली जाईल, असे निवड समिती प्रमुख चेतन शर्माने म्हटले आहे. सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दुसरा अष्टपैलू उपलब्ध नसल्याने हार्दिक पंडय़ाला पर्याय नसल्याचे सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.