19 डिसेंबर 1961… गोव्यासाठी मंगलमय होऊन आलेला मंगळवार! पोर्तुगीजांच्या 450 वर्षांच्या धर्मांध राजवटीतून मंगळवारी मुक्त झालेल्या गोव्याने त्या दिवसापासून सुरु केलेल्या प्रगतीपथाचा 60 वर्षांचा महत्वपूर्ण टप्पा रविवार 19 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण केला. वर्षभर चाललेल्या गोव्याच्या हीरक महोत्सवाचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शानदाररित्या पार पडला.
भारतीय स्वातंत्र्याच्या चौदा वर्षांनंतर मुक्त झालेल्या गोव्याने अजूनही बराच विकास साध्य केला असता. एकात्म भारत निर्माण करणारे सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही काळ हयात राहिले असते, तर गोव्याला हा ‘चौदा वर्षांचा वनवास’ भोगावा लागला नसता. गोमंतकीयांचे हेच शल्य पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आणि इतिहासपटावर पुन्हा प्रकाशझोत टाकला. इतिहासातील अशा कडू-गोड अनुभवांतून मार्गक्रमण करत गोवा आज ज्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, त्याला समृद्ध गोवा म्हणता येईल काय? आत्मनिर्भर-स्वयंपूर्ण गोवा म्हणता येईल काय? हे प्रश्न मूल्यांकनकार, विचारवंतांसह सर्वसामान्य जनतेलाही पडले आहेत. तरीही या साठ वर्षांत गोव्याने जे काही कमावले आहे, ते थोडे-थोडके नाही, हे ही तेवढेच खरे आहे. कोणत्या गोष्टीसाठी गोवा परावलंबी नाही, हे शोधावे लागेल असे अप्रिय वास्तव असतानाही ‘स्वयंपूर्ण गोवा’ बनविण्यासाठी सुरु असलेले प्रयत्नही आशादायी आहेतच! गोव्याची अन्य राज्यांकडे तुलना केली जाते, तेव्हा चौदा वर्षांचा वनवास भोगूनही गोव्याने त्या राज्यांपेक्षा मोठी मजल मारल्याचे स्पष्ट चित्र देशाला आणि जगालाही दिसून येते. मात्र हीरक महोत्सवात गोवा अत्यंत नाजूक वळणावर येऊन ठेपला असून त्याने आताच स्वतःला सावरले नाही तर अमृत महोत्सवात गोवा देशातील एक कलंकित राज्य बनण्याचा मोठा धोका आहे.
केवळ गोव्याचा भौगोलिक आकारच माणसाच्या ह्य्दयासारखा आहे, असे नव्हे तर गोवेकरांचे ह्य्दयही माणसुकीने परिपूर्ण आहे. देशातच नव्हे, तर जगात गोमंतकीय माणूस आपल्या स्वभावाने सर्वप्रिय आहे. तो सर्वांचे खुल्या मनाने स्वागत, आदरातिथ्य करतो. कामधंदा, अन्न, वस्त्र, निवारा देतो. माणुसकीने आपल्यामध्ये सामावून घेतो. मात्र आज हीरक महोत्सवात गोव्याचे हे वैशिष्टय़च गोव्याच्या मुळावर उठते की काय? एवढी भयानक परिस्थिती गोमंतकीयांच्या अवतीभवती आहे. कसल्याही धुंदीत असणाऱया माणसाला म्हणे अवतीभवतीचे काहीच भान नसते, तसेच बहुतांश गोमंतकीयांचे झाले आहे. पर्यटनाच्याखाली भरडल्या जाणाऱया गोव्याचे हे दुःख कोण समजून घेणार?
गोव्याच्या सिंहावलोकनात दिसतो तो गोवेकरांनी भारतीय बांधवांच्या सहकार्याने पोर्तुगीजांविरुद्ध दिलेली कडवा झुंज. गोवा भारताचा अविभाज्य प्रदेश आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यासाठी लाभलेली रशियाची सच्चे देशभक्त विसरु शकणार नाहीत. ज्या देशाने गोव्याच्या मुक्तीकडे दुर्लक्ष केले होते, त्याच देशाने मुक्तीनंतर कायदेशीररित्या गोव्याला भारतीय संघराज्यात सामावून घेऊन भारतीय स्वराज्य सुफळसंपूर्ण झाल्याचे अभिमानाने जगाला सांगितले. लोकशाहीचा तसा कोणताही अनुभव नसतानाही गोव्याने अत्यंत चांगल्याप्रकारे ती स्वीकारली आणि भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतःचे सरकार घडविले तो जनतेचा, कार्यकर्त्यांचा अन् नेत्यांचाही प्रवास गोव्याच्या प्रेमाने भारलेला होता. गोमंतकीयांचे गोव्यावरील ते प्रेम, तो विश्वास आज राहिलेला नाही. आपण महाराष्ट्राशी जोडले जावे की स्वतंत्र प्रदेश म्हणून रहावे, हा ऐतिहासिक निर्णय गोमंतकीयांनी स्वक्षमतेने घेतला. गोवा महाराष्ट्रात विलीन न झाल्याने गोव्याच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त झाला. अन्यथा आज गोवा कुठे असता? मोठा राजकीय संघर्ष करुन गोव्याने स्वतःचे घटकराज्य मिळविले. स्वतःची राजभाषा कोकणी ठरविली, तिला घटनेच्या आठव्या परिशिष्ठात स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता मिळविली. हा सारा संघर्ष असला तरी तो गोव्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरला.
ज्या गोवेकरांना प्राथमिक शिक्षणसुद्धा घेणे अवघड बनले होते, त्यांना भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे पदवी, पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेणे शक्य झाले. गोव्याच्या गतिमान विकासाची कवाडे खुली झाली. कृषी बरोबरच औद्योगिक विकासाची नांदी झाली. भाऊसाहेब बांदोडकर, शशिकलाताई काकोडकर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत गोव्याने स्थिर, गतिमान सरकार आणि सर्वांगीण, पायाभूत विकास पाहिला त्याच गोव्याने नंतरच्या काळात जे घाणेरडे राजकारण पाहिले ते आज हीरक महोत्सवातही गोवेकरांना पहावे लागत आहे, हे केवढे मोठे दुर्दैव! ज्या गोव्याने देशाला अनेक महान देणग्या दिल्या त्याच गोव्याने ‘आयाराम-गयाराम’ राजकीयवृत्तीही देशाला दिली. कोणीही कितीही शेखी मिरविल्या तरी बहुतांश राजकारण्यांना राजकीय शिस्त नाही, विचारांची बैठक नाही. गेल्या वीस वर्षांत रस्ते, महामार्ग, पूल, स्टेडियम्स, थिएटर्स, बसस्थानके अशा प्रकल्पांतून एका बाजूने गोव्याचा भौतिक विकास झाला तर दुसऱया बाजूने गोवेकरांच्या बौद्धिकतेची, मानसिकतेची मोठी घसरण सुरु आहे. शिकले सवरलेले गोमंतकीय कधी राजकारण्यांचे गुलाम बनतात तर कधी सरकारी अधिकाऱयांचे. पैशांसाठी गोमंतकीय माणूस काहीही करु शकतो, असे मानण्याइतपत मानसिकता खालावलेली आहे. एका बाजूने पुरुषांबरोबरच महिलाही स्वबळावर किंवा राखीवतेच्या कुबडय़ांवर का असेना पुढे जाताना दिसत आहेत. जो गोवा प्रगतीपथावर योग्य गतीने, योग्य शिस्तीने मार्गक्रमण करत होता, त्याच गोव्याची गाडी रुळांवरुन घसरण्याचा अवकाश आहे. समुद्रकिनाऱयांवरील शॅक, मांडवीतील कॅसिनो, हॉटेलांमधील कॅसिनो, पब्स, डान्स बार, अंमली-उन्मादक पाटर्य़ा, पर्यटकांसाठी दिवसरात्र स्वैरपणे मोकळा गोवा, जमीनविक्रीतून समांतर अर्थव्यवस्था, वर्षभर समुद्रकिनाऱयांसह शहरांपासून गावांपर्यंत चालणारा अंमली पदार्थ व्यवहार अशा अनेक वाईट गोष्टींनी कलंकित झालेला गोवा हा दुसरा चेहरा! एका बाजूने स्वत्व गमावून बसलेला गोवा तर दुसऱया बाजूने सत्तेच्या, झटपट पैशांच्या धुंदीत रमलेला गोवा. विकासाच्या नावाखाली कोटय़वधींच्या गोष्टी करणारे राजकारणी व्यासपीठावरुन संस्कृतीचे ढोल बडवतात आणि प्रत्यक्षात त्यासाठी विशेष योगदान दिले जात नाही. दक्षिण काशी म्हणून गौरविलेला देवभूमी गोवा आज भोगभूमी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, हे उघडय़ा डोळय़ांनी पहावे लागते, हे सुजाण गोमंतकीयांची दुःख!
राजू भिकारो नाईक