मुलीच्या लग्नासाठी घेतले होतं कर्ज
निलंगा / प्रतिनिधी
दोन लाखाचे कर्ज झाल्याने अल्पभुधारक शेतकऱ्याने गळफास घेऊ आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील अंबुलगा बुद्रूक येथील तरूण अल्पभुधारक शेतकरी तानाजी बाबुराव सुर्यवंशी वय ४५ वर्षे यानी आपल्या शेतात बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून मुलीच्या लग्नासाठी आयसीआसीआय बँकेकडून १लाख ७४ हजार व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अंबुलगा यांचे २० हजार असे एकून दोन्ही बँकेकडून दोन लाखाचे कर्ज काढले होते.तर बचत गटाचेही कर्ज तानाजी सुर्यवंशी यांच्यावर होते.
सुर्यवंशी यांच्या नावावार एक हेक्टर जमीन असून मागे झालेल्या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेले खरीप पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले होते. बँकेचा तगादा व मुलीच्या लग्नासाठीचे कर्ज या आर्थिक विंवचनेत या शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.पश्चात आई वडील पत्नी दोन मुली एक मुलगा असा परीवार आहे. मयत शेतकऱ्याचे वडील बाबुराव सुर्यवंशी यानी दिलेल्या अर्जावरून औराद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कामत करत आहेत.