(भाग एक अध्याय आठवा)
सातव्या अध्यायात अवधुतांचे पहिले आठ गुरु आपण अभ्यासले. चालू आठव्या अध्यायात पुढील नऊ गुरु आपण पाहिले. त्यांचा थोडक्मयात परामर्ष घेऊ. गुरुंशिवाय आत्मप्रचिती येत नाही म्हणून अवधुतानी हे प्रमुख गुरु केलेले आहेत. या गुरुंमध्ये असलेले गुण आत्मसात करणे व दुर्गुण टाळणे हे योग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. भगवंतांनी उद्धवाला योगी होण्याचा सल्ला दिलेला आहे. तो अमलात आणण्याच्या दृष्टीने यदु अवधूत संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. एकप्रकारे भागवताच्या अकराव्या स्कंधाचा म्हणजेच नाथ भागवताचा किंवा उद्धव गीतेचा हा पायाच आहे असे म्हणायला हरकत नाही.
अवधुतांचा पुढील गुरु अजगर आहे. अजगर जे मिळेल ते खातो किंवा वारा पिऊन राहतो. अंगी प्रचंड शक्ती असूनसुद्धा तिचे प्रदर्शन करत नाही. योग्यानेही सदैव आत्मरसात तृप्त होऊन जे मिळेल ते खावे. अजगराने जबडा पसरला व त्यातून वारा जरी आत गेला तरी तो ते भक्षण करतो. तशीच तयारी योग्याने ठेवावी. अजगराला अनेक दिवस आहार मिळाला नाही तरी तो एका जागी स्वस्थ पडून असतो. त्याप्रमाणे योग्याने दीर्घ आसन करून निदेशिवाय रहावे. अजगराप्रमाणे योग्याचे शरीरसामर्थ्य अफाट असते, बुद्धी तीव्र असते, इंद्रियबलही अलौकिक असते पण आहाराचा विचारही न करता, तो आत्मानंदात निमग्न असतो. पुढील गुरु असलेल्या समुद्राचे गंभीरपणा, परिपूर्णता, निर्मळपणा हे गुण योग्याने अंगी बाणवावेत. समुद्राप्रमाणे योग्यानेही नेहमी प्रसन्न रहावे. समुद्राच्या आतील भागातील पाण्याप्रमाणे योग्यानेही नेहमीच शांत आणि गंभीर रहावे. समुद्र कधी मर्यादा ओलांडत नाही तसेच योग्याने कधी गुरु आज्ञेचे उल्लंघन करू नये. समुद्र सर्वत्र खारट असतो. तसे योग्याने न राहता सर्व जीवांना मधुर बोध करत रहावा. योग्याकडून थोडासा जरी बोध मुमुक्षुला मिळाला तरी त्यामुळे त्याची भवव्यथा कमी होते. म्हणून मुमुक्षुनी नेहमीच भगवद्भक्तांना भजावे. जो समुद्रामध्ये उडी मारतो त्याच्या हाताला नानाप्रकारची रत्ने लागतात. त्याप्रमाणे योग्याशी जो समरस होतो त्याच्यावर ज्ञानरत्नांचा वर्षाव होतो. अवधुतांचा पुढील गुरु पतंग आहे पतंग नेहमीच दिव्यावर झेप टाकायला आतुर असतो. हा त्याचा स्वभाव आहे. वास्तविक पाहता दिव्यावर झेप टाकून जळून जाण्यापलीकडे त्याला काहीच मिळणार नसते. योग्याने हे लक्षात घेऊन आपणहून संकटात उडी घेऊ नये.
सांगायची आणखी एक गोष्ट म्हणजे, आपल्या पुढला पतंग दिव्याच्या अंगावर झेपावून जळून जातो हे पाहूनसुद्धा त्याच्यामागला पतंग दिव्यावर झेपावायचे काही सोडत नाही. तसेच स्त्रीसुखाच्या लोभापायी समोरचा बुडतो आहे हे पाहूनसुद्धा मागला मनुष्य तेच करत असतो. हे स्त्री पुरुष दोघानाही लागू आहे. कारण स्त्रियांना सोने, वस्त्रे, आभरणे, रत्ने इत्यादि गोष्टींचा अतोनात सोस असतो. म्हणून पुरुष वरील गोष्टींची प्रलोभने स्त्रियांना दाखवतात आणि आपल्या जाळय़ात ओढतात. ही मायेची सगुण रूपे आपली वाट लावल्याशिवाय सोडणार नाहीत हे समजून योग्याने या बाबतीत फार सावध असावे आणि इतरांनाही सावध करावे.
पुढील गुरु भुंगा आहे. भुंगा लहानमोठय़ा सर्व फुलातील मकरंद कोणताही भेदभाव न करता गोळा करतो तसेच मकरंद गोळा करता करता संध्याकाळ झाल्यास कमळाच्या पाकळय़ा मिटून जातात व भुंगा त्यात अडकून पडतो. खरं म्हणजे भुंगा मोठमोठय़ा लाकडी तुळय़ा सहजी पोखरून काढतो. त्याला कमळाच्या पाकळय़ा फाडून बाहेर येणे काय अवघड? पण तसे न करता कमळाच्या पाकळय़ांच्या मोहात पडून रात्रभर त्यात अडकून पडायला तयार असतो. भुंग्याच्या वर्तणुकीवरून लक्षात घ्यावे की, योग्याने कुणालाही दुखवू नये. दुसरे म्हणजे कितीही सशक्त, अधिकारी असलेली व्यक्ती मोहात अडकली की स्वार्थामुळे दुबळी होते. हे सर्व लक्षात घेऊन योग्याने स्वार्थापायी कोठेही गुंतून पडू नये. भुंगा कोणताही भेदभाव न करता सगळय़ा फुलातील मकरंद गोळा करतो. तसेच योग्याने सगळय़ांना समानतेने वागवावे.