नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाची आयपीएल स्पर्धा लंकन भूमीत भरवण्याचा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिला असला तरी सध्याच्या घडीला ही स्पर्धा लंकेत भरवण्याचा प्रश्नच येत नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले. अवघे जग कोव्हिड-19 च्या प्रकोपाविरुद्ध लढत असताना अशा प्रस्तावावर विचार करण्याची ही योग्य वेळ नव्हे, असे मंडळाने नमूद केले.
यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 29 मार्च ते 24 मे या कालावधीत आयोजित केली गेली. पण, कोव्हिड-19 मुळे प्रारंभी ही स्पर्धा दि. 14 एप्रिलपर्यंत व त्यानंतर अनिश्चित काळाकरिता लांबणीवर टाकली जात असल्याचे घोषित केले गेले आहे.
लंकन क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शाम्मी डीसिल्वा यांनी श्रीलंका ही स्पर्धा भरवण्यासाठी तयार असल्याचे यापूर्वी म्हटले होते. भारताच्या तुलनेत श्रीलंकेत कोव्हिड-19 प्रकोपाची व्याप्ती मर्यादित आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रस्ताव दिला होता. यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली.
‘अवघी जगरहाटी ठप्प झालेली असताना नियामक मंडळही काहीही निश्चित करण्याच्या स्थितीत नाही’, असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. एकीकडे, भारतात कोव्हिड-19 रुग्णांची संख्या 13 हजारवर पोहोचली असताना लंकेत आतापर्यंत 200 रुग्ण आढळून आले आहेत. भारतात बळींचीच संख्या 400 च्या वर गेली आहे.
लंकेतील परिस्थिती काय सांगते?
श्रीलंकेत गॅले, कॅन्डी व प्रेमदासा या तीन स्टेडियमवर सामने आयोजित केले जाऊ शकतात. पण, तेथील अंतर्गत विमान प्रवासात निम्म्याने कपात केली गेली आहे. सध्याच्या घडीला ही स्पर्धा लंकेत भरवली तर लंकन मंडळाला निश्चितच घसघशीत आर्थिक कमाई होईल. याशिवाय, यामुळे जुलैमध्ये भारताविरुद्ध मर्यादित षटकांची क्रिकेट मालिकाही निश्चित होईल. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, लंकेत 3 टी-20 व 3 वनडे लढती होणे अपेक्षित आहे. बीसीसीआय मात्र याला अजिबात अनुकूल नाही. तूर्तास, यंदाची आयपीएल स्पर्धा शक्य झाल्यास सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.